कॉंग्रेसच्या राजवटीत सर्वाधिक घुसखोरांना देशाबाहेर काढले
पिंपरी (प्रतिनिधी) –“जनसंघाच्या स्थापनेपूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगसोबत पश्चिम बंगालमध्ये सत्तेत सहभागी होतात, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास हेगडेवार आक्षेप घेतात, अशी परंपरा, विचारधारा भाजपाची आहे. या पक्षाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री जनतेशी खोटे बोलतात तर एकमेकांविरुद्ध मते प्रकट करतात. पंतप्रधान म्हणून काम करणारेच जर खोटे बोलत असतील ती जनतेची प्रतारणा असून भारतीय लोकाशाहीसाठी लाजीरवाणी बाब आहे,’ अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी भाजपाचा समाचार घेतला.
कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 28) डॉ. महाजन यांच्या हस्ते प्राधिकरण, आकुर्डी येथे आयोजित कार्यक्रमात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, निगार बारसकर, विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, लक्ष्मण रुपनर, अविनाश कांबळे, बेंजामिन डिसोजा, समाधान सोरटे, विश्वनाथ खंडाळे, दीपक जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. महाजन म्हणाले, एनआरसी फक्त आसाम राज्यापुरते मर्यादित होते. हिंदू वोट बॅंकेचा फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे. आसाममध्ये 19 लाख घुसखोर निघाले. त्यात 16 लाख हिंदू होते. भाजपच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळापेक्षा कॉंग्रेसच्या काळात जास्त घुसखोर शोधून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्यात आले. ही आकडेवारी भाजपनेच संसदेत सादर केली आहे. एनपीआर – एनसीआर (राष्ट्रीय जनगणना आणि नागरिकत्व सुधारणा) यांचा काही संबंध नसल्याचे सांगत देशाचे गृहमंत्री अमित शहा जनतेशी खोटे बोलतात. त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान वेगळीच मते मांडतात, ही बाब दुर्देवी आणि लाजीरवाणी आहे. या लोकांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचेही महाजन म्हणाले.
सचिन साठे म्हणाले की, देशाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासामध्ये कॉंग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. स्वागत सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव यांनी केले. सूत्रसंचालन मयूर जयस्वाल केले तर शेवटी विशाल कसबे यांनी आभार मानले.