जयपूर – कर्णधार श्रेयस अय्यरचे नाबाद शतक आणि शिवम दुबे व यशस्वी जयस्वाल यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर मुंबईने महाराष्ट्राचा विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात 6 गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने यश नहार व अझीम काझी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 9 बाद 279 धावा केल्या. केदार जाधवने याही सामन्यात निराशा केली. एकवेळ 4 बाद 38 अशा बिकट स्थितीतून नहार व काझी यांनी संघाला सावरले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 226 धावांची भक्कम भागीदारी केली. या दोघांनीही आपापली शतके पूर्ण केली. हे दोघे बाद झाल्यानंतर महाराष्ट्राचा डाव पुन्हा गडगडला.
मुंबईकडून धवल कुलकर्णीने 5 गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक 280 धावा मुंबईने 48 व्या षटकांत केवळ 4 गड्यांच्या मोबदल्यात केल्या. मुंबईच्या जयस्वाल व पृथ्वी शॉ यांनी 74 धावांची सलामी देत थाटात केली. शॉ लवकर बाद झाला. त्यानंतर जयस्वालही 40 धावांवर परतला. कर्णधार श्रेयस अय्यरला साथ देत सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरला.
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर शिवम दुबेने अय्यरला योग्य साथ दिली. तो 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सर्फराज खानने अय्यरला साथ देत संघाचा विजय साकार केला. अय्यरने 99 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावाची खेळी केली.