देहुरोड – देहुरोड शहरामध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गावर 90 कोटींचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. यासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतल्याने कमी वेळेत उड्डाणपूल मार्गी लागून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे, अशी भावना देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी व्यक्त केली आहे.
शेलार म्हणाले की, देहुरोड स्मशानभूमी, शहरातील अंतर्गत रस्ते, शेलारवाडी ते किन्हई रस्ता, पाण्याची योजना, बांधकाम योजना अशा अनेक योजनांचा आमच्या गावातील अनेक गरिबांना फायदा झाला आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून रोड, स्मशानभूमी अशी अनेक विकासकामे वेगाने करण्यात आली.
ज्यामुळे आमचे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. “भाजपला मत म्हणजेच विकासाला मत’ असून, देहुरोडमधील अनेक पायाभूत सुविधाची कामे पुढील काळात मार्गी लागतील, त्याकरिता बाळा भेगडे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वजण काम करीत आहेत.
दरम्यान, गुरुवारी सकाळी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे देहुरोड आणि शेलारवाडी परिसरात ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करून प्रचार फेरी सुरू करण्यात आली. देहुरोड परिसरात भेगडे यांच्या माध्यमातून अधिक विकासकामे झाल्याने नागरिकांमध्ये बाळा भेगडे यांच्याच नावाचा सूर होता.
यावेळी गावातील सर्व रस्त्यांवर महिलांनी घरापुढे रांगोळी काढून भेगडे यांचे स्वागत केले. देहुरोडमध्ये बांधण्यात आलेल्या पुलामुळे शहरात होणारी बाहेरील वाहनांची गर्दी कमी झाल्याने गावातील नागरिकांचे गावातील प्रवास आणि रोडवरील व्यवसायांना जागा मोकळी झाल्याने त्यांनी राज्यमंत्र्यांचे आभार मानले. आमचे मत विकासाला अशा घोषणांनी जयजयकार केला.