देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
मुंबई: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या, कर्जमुक्त करण्याच्या घोषणा केल्या गेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात केवळ दोन लाखाचे कर्ज माफ करण्यात आले. त्यातही अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
सप्टेंबर 2019 पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. तो पुन्हा थकबाकीत जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफीची मुदत जुलैपर्यंत वाढवून चालू कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
नियम 293 अन्वये विरोधी पक्षाकडून विधानसभेत अवकाळी पाऊस, कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार याबाबत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. चर्चेला सुरुवात करताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर प्रखर टीका केली. सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तब्बल 94 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली.
सध्या सरकारमध्ये असलेल्या उध्दव ठाकरे, अजित पवार यांनी तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अनेक घोषणा केल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी कोरडवाहू पिकासाठी 25 हजार, तर बागायतीला 50 हजार मदत देऊ असे सांगितले होते. अजित पवार हेक्टरी 1 व दीड लाखाची मदत देऊ म्हणाले. पण राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीव्यतिरिक्त आत्तापर्यंत एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिला गेलेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करताना, परवा झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.
शार्जीलच्या देशद्रोही समर्थकांवरही कारवाई करा !
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करताना गृहखात्याने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी फडणवीस यांनी केली. सीएएच्या विरोधात आंदोलन करताना देशद्रोही घोषणा देणाऱ्या शार्जीलच्या समर्थनार्थ मुंबईतील आंदोलनात नारे दिले गेले. या लोकांवर व 100 कोटी हिंदूंना 15 कोटी मुस्लिम भारी पडतील अशी वक्तव्ये करणाऱ्या वारीस पठाण यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.