पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले. त्यामुळे पुन:श्च हरिओम सारखी परिस्थिती निर्माण झाली.
मात्र हताश न होता पुन्हा एकदा ताज्या दमाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले प्रयत्न सुरू केल्याचे वारंवार दिसून येत आहे. नुकतंच या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बैलगाडा शर्यतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्य सरकारमधील सर्व घटकपक्षांची भूमिका आणि त्यावरील बंदी उठवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांसमोर मांडली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या विषयात संविधानात्मक तोडगा काढण्यासाठी केलेल्या कामाची माहिती यावेळी कोल्हे यांनी दिली.
महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व देशी गोवंशाचे संवर्धन या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी हीच आमची भूमिका असून त्यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
बैल या प्राण्याचा ‘संरक्षित प्राणी’ या यादीतील समावेश केंद्र सरकारने वगळला तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणे शक्य आहे. या मागणीसाठी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी वारंवार आवाज उठवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या काळात पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात पत्र दिले होते.
मात्र भाजपच्या २३ खासदारांपैकी कोणीही याविषयावर संसदेत ठाम बाजू घेतलेली नाही. त्यामुळे दिल्लीत सुटणाऱ्या प्रश्नासाठी गल्लीत आदळआपट का सुरू आहे, असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकारण न करता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यायला हवे.
त्यामुळे बैलगाडा शर्यतबंदी उठविण्याच्या आंदोलनामध्ये कोणताही श्रेयवाद नको, राजकीय मतभेद बाजूला ठेवून, पक्षीय मतभेद विसरून सामुहिक प्रयत्नातून हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन कोल्हे यांनी भाजप नेत्यांना केले आहे.