कात्रज – राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान परिसरातील सोसायटीतील रहिवासी कात्रज-मोरे बाग येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथाचा वापर करतात, उद्यान बाजूकडील पदपथाचे काम नव्यानेच झाले आहे. परंतु, या पदपथांवरच अवजड वाहने उभी राहत असल्याने हे पदपथ वाहने उभी करण्यासाठी की चालण्यासाठी? असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
कात्रज-मोरे बाग परिसरातील वंडर्स सिटी सोसायटीच्या रस्त्याच्या पदपथावर गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहने उभी केली जात आहेत. पदपथावर वाहने असल्याने नागरिकांना मध्यरस्त्यावरून चालावे लागत आहे. वाहने उभी असल्याने पदपथाचा वापर नागरिकांना करता येत नाही.
पदपथावर वाहन लावल्यामुळे पदपथावर मनपा स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना साफसफईदेखील करता येत नाही. पदपथावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. पदपथासाठी लाखो रुपये खर्च करून या पदपथाचा वापर अवजड वाहने उभी करण्यासाठी होत असेल, तर पादचाऱ्यांनी चालायचे कोठून, असा सवाल केला जात आहे. प्रभाग क्र. 40 मधील रस्त्यावर हे प्रकार सुरू असून पोलीस वाहतूक विभागाकडूनही अशा वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे.