कोरेगाव भीमा, पेरणे फाटा येथे पोलीस, महसूलचे अधिकारी तळ ठोकून : सुरक्षेची तटबंदी
वाघोली – विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी प्रशासनाने यावर्षी लोणीकंद ते शिक्रापूरपर्यंत जवळपास 250 एकर जागेवर 15 पार्किंग यार्डस बनविले आहेत. 15 हजार फोर व्हीलर, 3 हजार बसेस, 10 हजार टू व्हीलर्स बसतील अशी व्यवस्था असणार आहे. पार्किंग यार्डसपासून विजय रणस्तंभ परिसराच्या कामापर्यंत भाविकांची ने-आण करण्यासाठी गेल्यावर्षीपेक्षा 50 अधिक बसेस वाढविण्यात आल्या आहे. संध्याकाळनंतर स्तंभपरिसरात हायमास्ट व स्ट्रीट लाईट्सची व्यवस्था, रॅम्पची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने विजय रणस्तंभ परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी व महानिरीक्षक यांनी पूर्व तयारीची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले की, गेल्यावर्षी भाविकांना सोयीसुविधा व सुरक्षा पुरविण्यासाठी विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमात प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने केलेल्या सकारात्मक कामांच्या धर्तीवरच यावर्षीसुद्धा मागील दोन महिन्यांपासून प्रशासन काम करीत आहे. गेल्यावर्षी जाणवलेल्या त्रुटी यावर्षी दूर करण्यात आल्या आहेत.
गेल्यावर्षी बिनदिक्कतपणे पार पडलेल्या विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमात पार्किंग, पाणी, टॉयलेट, स्ट्रीट लाईट्स कमतरता, परतीच्या प्रवासातील कोंडी आदी जाणवलेल्या त्रुटी प्रशासनाने यावर्षीच्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीमध्ये दूर केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे, गेल्यावर्षीपेक्षा अधिक 30 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याबरोबरच गेल्यावर्षीपेक्षा 200 टॉयलेट अधिक उपलब्ध असणार आहेत. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या सज्ज राहणार आहेत.
सर्व सुविधायुक्त 30 ऍम्ब्युलन्स, ओपीडी सेंटर नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. 260 पेक्षा अधिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. ग्रामस्थांसोबत सकारात्मक चर्चा करून शांतता बैठकांद्वारे जातीय सलोखा राखण्याचे काम केले आहे. पुणे – नगर महामार्गावरील प्रमुख गावांमध्ये दारू विक्री बंद करून शाळांना सुट्टी देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके म्हणाले की, यावर्षी 37 पोलीस युनिटसमधील 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त व समता सैनिक दलाचे जवान मानवंदना कार्यक्रमासाठी तैनात असणार आहेत. गेल्यावर्षी परतीच्या प्रवासावेळी झालेली कोंडी सोडविण्यासाठी देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोणीकंद ते शिक्रापूरपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद करून पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
लोणीकंद ते शिक्रापूरपर्यंतचा परिसर 300 च्यावर सीसीटीव्ही व ड्रोनच्या कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असणार आहे. 8 ते 9 सभांनाच परवानगी देण्यात आली आहे. 740 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. स्थानिकांच्या मदतीने एकोप्याचे वातावरण तयार करण्यात आल्यामुळे भाविकांनी विजय रणस्तंभ अभिवादन करण्यासाठी यावे.