फ्रेंच अर्थतज्ज्ञाने मोदी सरकारला दाखवला आरसा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अर्धवटच सोडून दिल्यामुळे भारतातील आर्थिक स्थितीविषयी सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विदेशी गुंतवणूकदार आता भारताला टाळत आहेत असे फ्रेंच अर्थतज्ज्ञ गय सोरमन यांनी म्हटले आहे.
स्थानिक आणि विदेशी गुंतवणुकदारांमध्ये सध्या धास्तीचे वातावरण असून त्यामुळे ते भारतात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. सोरमन हे विख्यात अर्थतज्ज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्रावर अनेक पुस्तके लिहीली आहेत. अर्थशास्त्रातील ते एक अधिकारीक व्यक्ती समजले जातात.
त्यांनी भारताविषयी नोंदवलेल्या निरीक्षणाला त्यामुळेच विशेष महत्व दिले जात आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदींनी सुरूवातीच्या काळात धाडसाने काही प्रक्रिया सुरू केली होती. त्यात त्यांनी मेक ईन इंडिया सारख्या संकल्पनांचा पुरस्कार केला होता. त्यामुळे भारतात गुंतवणुकीसाठी विधायक वातावरण तयार झाले होते. पण आर्थिक सुधारणांचे सारेच प्रयास मोदींनी अर्ध्यावरच सोडून दिले आहेत.
त्यामुळे सरकारला व देशाला सध्या कमीपणा आल्यासारखी स्थिती झाली आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. हिंदुत्व व नागरिकत्व कायदा हे अयोग्य की अयोग्य या वादात मी पडू इच्छित नाही पण यामुळे भारतात गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाल्याचेही वातावरण निर्माण झाले आहे असे ते म्हणाले.
जागतिक मंदीच्या स्थितीचा सामना करीत असताना भारतात या गुंतागुंतीमुळे नकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे असेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थिक स्थितीबाबत भारतीय पंतप्रधानांना इमेल पाठवून काही प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही असेही सोरमन यांनी सांगितले.
ते म्हणाले की गुंतवणूक आणि विश्वासाचे वातावरण याचा एकमेकांशी खूप संबंध असतो. पण दुर्देवाने भारतात राष्ट्रीय पातळीवर विश्वासाचे वातावरणच बिघडले आहे ही दु:खद बाब आहे. ती सरकारने टाळायला हवी होती. भारताची आकडेवारी आणि जीडीपी मोजण्याची पद्धत विश्वासार्ह नाही असे मतही त्यांनी स्पष्टपणे नोंदवले.