नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी काही मोलाचे सल्लेही दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
विजेत्यांनी विजय डोक्यात जाऊ देऊ नये आणि पराजितांनी हार मानू नये असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंची विचारपूस केली. त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. त्याचबरोबर त्यांचे ऑलिम्पिक खेळादरम्यानचे अनुभवही जाणून घेतले. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना सांगितले की, आशा असायला हवी, परिश्रम करायला हवेत, पराक्रमही हवा पण निराशा मात्र कधीच यायला नको.
यावेळी संवाद साधताना पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंना सांगितलं की, खेळाडूंच्या आयुष्यात हारजित येतंच असते. त्यामुळे विजय डोक्यात जाऊ देऊ नये आणि अपयश, हार कधीच मनात राहू देऊ नये. हा मंत्र आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. विजय जर डोक्यात राहिला तरी त्याचा काही उपयोग नाही आणि हार मनात राहिली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक विजेत्यांसोबतच सर्वच खेळाडूंशी तसंच प्रशिक्षकांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक खेळाडूंशी थट्टामस्करीही केली. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले काही किस्सेही सांगितले. देशाच्या हॉकी संघाशी संवाद साधताना हॉकी खेळाडूंनी नरेंद्र मोदींचे आभार मानले.