मुंबई – भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा याने डेल स्टेन, ब्रेट ली व जोश हेझलवूड यांची गोलंदाजी खेळताना दडपण यायचे असे मत व्यक्त केले होते. मात्र, तरीही त्यांच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली नाही तर त्यांच्यावर आक्रमण केले कारण डर के आगे जीत है याच दृष्टिकोनातून फलंदाजी करतो, असेही रोहितने स्पष्ट केले.
हे तीनही गोलंदाज खूपच वेगाने चेंडू टाकतात. ली जरी निवृत्त झाला असला तरीही त्याच्या गोलंदाजीवर जीतके वेळा बाद झालो तेव्हा नेटमध्ये सराव वाढवला व त्याचा पुन्हा सकारात्मकतेने सामना केला. सध्याच्या कालखंडात स्टेन आणि हेझलवूड जास्त भेदक आहेत. त्यांच्या गोलंदाजीचा सामना करताना कठीण जाते. अर्थात मानसिकता सकारात्मक ठेवूनच त्यांचा सामना करतो. आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असते असाच दृष्टिकोन ठेवून त्यांच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही रोहितने स्पष्ट केले.
कोणत्याही सामन्यात पहिली पाच षटके गोलंदाजांच्या चेंडूचा, स्विंगचा तसेच बाउन्सचा अंदाज घ्यायचा व त्यानुसार खेळी करायची. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत असेल तर मात्र आपला नैसर्गिक खेळ करायचा. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यासाठी कशाही वेळा धोका पत्करावा लागतो, मात्र ते देखील आपली विकेट न गमावता आक्रमण केले तर गोलंदाजांवरच दडपण येते हा माझा अनुभव आहे, असेही रोहित म्हणाला. सध्याच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडसह दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा देखील उत्तम गोलंदाज आहे. या दोघांकडेही वेग आहे, स्विंगही आहे. त्यांच्या षटकातील काही चेंडू खेळले की खेळपट्टीची त्यांना किती मदत होते ते पाहून मगच त्यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करायचे की धोका न पत्करता खेळ करायचा हाच दृष्टिकोन ठेवून मी फलंदाजी करतो, असेही रोहितने सांगितले.
आयपीएलबाबत आशावादी…
करोनाचा धोका वाढल्याने आयपीएल जरी स्थगित करण्यात आली असली तरीही ही स्पर्धा पूर्ण रद्द होईल असे मला वाटत नाही. हा धोका येत्या काळात निश्चितच संपुष्टात येईल व स्पर्धा होईल, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.