मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री व निर्मात्या मंजू सिंग यांचे निधन झाले आहे. गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे व त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंजू सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. स्वानंद किरकिरे यांनी भावूक ट्वीट करत लिहिले की , ‘मंजू सिंग जी आता राहिल्या नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी ‘एक कहानी’, ‘शो टाइम’ इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जींच्या ‘गोलमाल’ चित्रपटातील रत्ना हमारी प्यारी मंजू जी, तुमचं प्रेम कसे विसरता येईल.. गुडबाय!’
मंजू सिंग यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘शो थीम’ या पहिल्या प्रायोजित कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांनी नंतर रंगीत प्रसारणाच्या सुरुवातीच्या काळात दूरदर्शनसाठी मालिका, लहान मुलांचे कार्यक्रम, आध्यात्मिक ते सक्रियता आणि इतर अर्थपूर्ण विषयांपर्यंत अनेक संस्मरणीय दूरदर्शन कार्यक्रमांची निर्मिती केली.
‘एक कहानी’, ‘स्वराज’, ‘अधिकार’ यामध्ये काम केले यासह मुलांचा शो ‘खेल खिलाडी’ त्यांनी अँकर केला जो त्यावेळच्या सर्वात जास्त काळ चाललेल्या शोपैकी एक होता. मंजू सिंग यांनी 1979 साली आलेल्या गोलमाल चित्रपटात अभिनेता अमोल पालेकरच्या धाकट्या बहिणीची ‘रत्ना’ची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.