कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालेला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. मात्र या निवडणुकीत विजयी होण्याचे भाजपचे स्वप्न अपूर्णच राहिले. यावर प्रतिक्रिया देत मतदारांचा कौल आम्हाला मान्य असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘आम्हांला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसने 50 वर्ष केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही पाच वर्षात काय केलं हे मांडतो. मात्र आम्हांला राज्यात केवळ पाच वर्षे मिळाली. शहराच्या विकासासाठीचे अनेक प्रकल्प आम्ही केंद्राकडून मंजूर करुन घेतले आहेत. आता त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे विकास हाच आमचा मूळ मुद्दा होता.’ असे त्यांनी म्हटले आहे.
एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. दरम्यान, या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली आहे.