जामखेड -एकीकडे जामखेड तहसील प्रशासन सर्वसामान्यांसाठी दुधाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाजीपाला व्यापारी शेतकऱ्यांकडून अत्यल्प दराने खरेदी करून शहरात प्रशासनाच्या आशीर्वादाने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करीत आहेत. जामखेड शहरात करोनाचे 17 रुग्ण आढळल्याने गेल्या दि 10 एप्रिलपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संपूर्ण शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर केले आहे.
तहसील प्रशासनाने नागरिकांसाठी घरपोच भाजीपाला देण्यासाठी काही विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. मात्र हे विक्रेते तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांकडून अत्यल्प भावाने भाजीपाला खरेदी करून जामखेड शहरातील विविध भागात जादा भावाने विक्री करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. तहसील कार्यालय कारवाई करण्याकडे कानाडोळा करत आहे. जामखेड शेजारील आष्टी तहसील प्रशासने भाज्यांचे दर निश्चित करून नागरिकांना रास्त भावाने भाजीपाला मिळत आहे. जामखेड शहरातही भाज्यांचे दर प्रशासनाने निश्चित करून नागरिकांना भाजीपाला दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे
लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शहरातही हॉटस्पॉट असल्याने बॅंका बंद आहे. त्यामुळे ज्याच्याकडे थोडेफार पैसे बॅंकेत आहेत. त्यांनाही पैसे काढता येत नाही. त्यामुळे नागरिक पुरता वैतागला असताना अशा परिस्थितीत जामखेड शहरात सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरु आहे.
याकडे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षातील नेते काहीही बोलण्यास तयार नाही. दोन दिवसांपूर्वी शहरात किरकोळ दूधाचे दर कमी करण्यासाठी प्रशासनाने जीवाचा आडापीटा करून किरकोळ दुधाचे भाव कमी करून प्रशासनाने शहरात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत दुधाचे वाटप करण्यात येत आहे. मात्र भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असताना प्रशासन शांत कसे बसू शकते, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.