एका नातेवाईकांकडे पादुका पूजनाच्या निमित्याने जाण्याचा योग आला होता. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, सश्रद्धपणे अक्कलकोट येथील श्री गजानन महाराज ह्यांच्या पादुकांचे पूजनाचा तो कार्यक्रम होता.
गजानन महाराज म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर मूर्ती उभी राहते ती शेगावीच्या सिद्ध गजानन महाराजांची. पण हे होते अक्कलकोटचे गजानन महाराज. त्यांच्या पादुका पूजनाबरोबरच त्या ठिकाणी आणखी एक लक्षवेधी छोटासा पण तेवढाच महत्त्वाचा कार्यक्रम संपन्न झाला, तो म्हणजे अग्निहोत्र पूजनाचा. ही अग्निहोत्राची आपल्या साधकांना महाराजांनी दिलेली उपासना किती महत्त्वाची आहे, ह्या संदर्भात उपासक आणि प्रचारक मंडळींकडून जी माहिती दिली गेली ती अशी की-
अग्नी हे पंचतत्त्वातील एक महत्त्वाचे तत्त्व असून पंचतत्त्वाच्या पूजनास आपल्या संस्कृतीत मानाचे स्थान आहे. अग्निपूजा ही आपल्या संस्कृतीची महत्त्वाची खूण आहे. पूर्वी दानव, मानव आणि देवदेवतांना आपल्या मनोकामना सिद्धीसाठी विविध प्रकारचे यज्ञयाग, होमहवन इ. विधी करावे लागत. तोच अग्निपूजेचा छोट्या प्रमाणात प्रत्येकाने आपल्या घरात संपन्न करायला हवा असा महत्त्वाचा विधी म्हणजे अग्निहोत्र.
सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तांब्याच्या एका विशिष्ट पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांचे चार तुकडे ठेवावेत. त्यावर तुपात भिजवलेली वात किंवा शुद्ध कापूर ठेवावा. त्यावर थोडे गायीचे तूप घालून सूर्योदय आणि सूर्यास्ताची नेमकी वेळ साधून महामृत्यूंजय मंत्राचा जप करायचा. त्या मंत्रासह अग्नि प्रज्वलित करून त्यात अखंड तांदळाच्या दाण्याच्या तीन चिमटी आहुत्या द्याव्यात. सकाळी हा विधी करताना ॐ सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम। प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम। आग्नये स्वाहा, अग्न्येय इदं न मम। असे म्हणून या आहुत्या द्यायच्या असतात. त्या अग्निदेवतेकडे उत्तम आरोग्य, इष्ट कामनापूर्तीचे वरदान मागायचे. हा तो अगदी काही मिनिटांचा छोटासा विधी.
सध्याच्या काळात वाढत असणारे मानसिक अस्थैर्य यावर चांगला परिणाम होण्यासाठी या उपासनेचा प्रचार आणि प्रसार होणे हे नितांत गरजेचे आहे.
– अरुण गोखले