आंबेगावच्या तहसीलदारांचे ग्रामपंचायतींना आदेश
मंचर- आंबेगाव तालुक्यातील सरकारी व इतर पुणे व मुंबई येथील वाहतूक करून गावी परतणाऱ्या व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांना क्वारंटाइन करण्याबाबत आंबेगाव तालुक्याच्या तहसील विभागाने सरकारी आदेश काढला आहे. आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे ग्रामपंचायत प्रशासनाने करावी, असे या आदेशात नमूद केले असल्याची माहिती आंबेगाव तालुका तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील विविध गावच्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांना त्याच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना या विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळले असल्याने तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्ह्यामध्ये प्रवास करून आलेले आहेत. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची (उदाहरणार्थ भाजीपाला भुसार व इतर) वाहतूक मुंबई,पुणे व इतर ठिकाणाहून करून व्यापारी व नागरिक पुन्हा गावी परत येतात. या व्यापारी व नागरिकांना आपण क्वारंटाइन करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांवर आपण लक्ष ठेवून त्यांना वेळीच गावचा संपर्क होऊ न देता ग्रामपंचायत स्तरावर क्वारंटाइन करण्यात यावे, असे आदेश तहसीलदार यांनी दिले आहे.