पुरंदर तालुक्यातील तरकारी पिकांचा बाजारभाव मातीमोल
सासवड – जगभर थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे पुरंदर तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव पुरंदर तालुक्यातील व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवू लागला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झालेले आहेत.
करोना व्हायरस हा चीनमधून आला असून चायनीज पदार्थ खाल्ल्यामुळे करोना होतो, अशा अफवांमुळे तालुक्यातील चायनीज पदार्थांकरिता उत्पादन केले जाणाऱ्या कांद्याची पात, कांदा, कोबी, ढोबळी मिरची, हिरव्या मिरच्या विविध रंगांच्या ढोबळी मिरची यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
चायनीज पदार्थांची मागणी घटली असून तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे चायनीज पदार्थ कोणीही खात नाही. परिणामी चायनीज पदार्थांसाठी लागणारा भाजीपाला बाजारपेठेत पडून आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना काबाडकष्ट करून पिकविलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला मातीमोल झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. निसर्गाशी दोन हात करत प्रतिकूल परिस्थितीत शेतीमाल पिकवणाऱ्या पुरंदरचा शेतकरी आज परदेशातील एका रोगामुळे अडचणीत आला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा, शेतीमालाचे भावाचे अनिश्चितता, प्रतिकूल नैसर्गिक वातावरण आदींचा सामना शेतकरी करीत आहे.
बाजारभावातील घाटा शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरविणारा आहे. पुरंदर तालुक्यातील करोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यात प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील व्यवहार ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरंदर तालुक्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट जाणवत आहे.
पुरंदर तालुक्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्यामुळे हॉटेलमधील पदार्थांच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसाठी भाजीपाला पिकवणारे शेतकरी हवालदिल झालेला आहे. प्रशासनाकडून जनजागृती केल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हॉटेल व्यवसायवर होणारे विपरित परिणाम कमी होऊ शकतात. त्यासाठी प्रशासनाने समन्वय साधण्याची आवश्यकता आहे.