बालाजी देवस्थानला जाणाऱ्या भाविकांचे हाल
केतकावळे (वार्ताहर) – सासवड नारायणपूर व नारायणपूर चिव्हेवाडी घाट रस्त्यात सध्या सुरू असलेली कामे वर्षभरापासून संथगतीने सुरू आहेत. काही ठिकाणी काम बंद आहे. त्यामुळे नारायणपूर व बालाजी देवस्थानास जाणाऱ्या नागरिकांना रखडलेल्या रस्ता कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या धुळीमुळे दोन चाकी वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरापासून सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. बऱ्याच ठिकाणीतर काम बंदच असून अर्धवट खोदलेल्या व अर्ध्या मातीने भरलेल्या रस्त्याने भाविकांना कसरत करीत जावे लागत आहे.
पुरंदर तालुक्यातील नारायणपूर बालाजी मंदिर (केतकावळे) हे देवस्थाने आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना हा रस्ता यातनामय झाला आहे. त्यातच मोठ्या गाड्या आल्यानंतर उडणारी धूळ डोळ्यात जात आहे. त्यामुळे भाविक धास्तावून गाडी चालवत आहेत. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होणार, याची प्रतीक्षा भाविकांना आहे. अतिवृष्टीमुळे चिव्हेवाडी घाटातील रस्ता खचला असून त्यात भरलेल्या मातीने व साईडपट्टया नसल्याने बरेचसे नागरिक घसरून पडत आहेत, अशी तक्रार सरपंच दीपक चिव्हे व माजी सरपंच बाळासाहेब साबळे यांनी केली.
नारायणपूर – सासवड रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे बरेच नागरिक कोडीतमार्गे नारायणपूरला ये- जा करीत असल्याचे शिवजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब जगताप, उद्योजक मालक प्रवीण जगताप, बोंगाने सर, पाटील सर, सागर काकडे यांनी सांगितले. नारायणपूर- चिव्हेवाडी घाट रस्त्यात सध्या सुरू असलेली कामे वर्षभरापासून संथगतीने सुरू आहेत.