नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’वर टिप्पणी केल्याबद्दल न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर देखील अनेक प्रश्न विचारले. सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी भाजप विरोधात काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांचे नाव घेत भाजपाला डिवचले.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आता वीर सावरकरांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्वातंत्र्य वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर म्हटले की, ‘वीर सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही. राहुल गांधी हे वीर सावरकर नाहीत हे सांगण्याची गरज नाही. जवाहरलाल नेहरूंचे पाप लपवण्यासाठी ते सावरकरांच्या नावाचा वापर करतात.’
ते पुढे म्हणाले की, ‘ज्या कुटुंबाने देश तोडला, ते देश एकत्र करणार का? १०० वेळा खोटे बोला आणि लोक ते खरे मानतील’ असा हिटलरचा प्रचार करणारे गोबेल्सचे धोरण आहे. सावरकरांनी कुठेही माफी मागितलेली नाही. राहुल गांधींना माझे आव्हान आहे की त्यांनी हे सिद्ध करावे. मी अनेक पुरावे सादर केले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खुद्द राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात अनेकदा माफी मागितली आहे. काँग्रेस असत्याला सत्य मानते. त्यांना लोकांच्या मनातही भरायचे आहे. असं म्हणत वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर राहुल गांधींवर टोला लगावला, म्हणाले- देश तोडणाऱ्या भारताला तुम्ही एकत्र कराल का? असं म्हणत रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे.