परिंचे – गेल्या आठ दिवसांपासून नीरा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे वीर (ता. पुरंदर) धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
मंगळवारी (दि. 25) संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार वीर धरणात 60 टक्के पाणीसाठा झाला असल्याचे शाखा अधिकारी लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले. या वर्षी वीर धरणाची पाणी पातळी खालावली होती 2019 नंतर पहिल्यांदाच पाणी पातळीने निचांक गाठला होता समाधान पावसाने वीर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नीरा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या चार धरणांमध्ये 61 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशी चार धरणांमध्ये 75 टक्के पाणीसाठा झाला होता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कमी पाणीसाठा झाला आहे.
वीर धरणातून फलटण, इंदापूर, बारामती, माळशिरस, सांगोला, खंडाळा, पंढरपूर, पुरंदर हे तालुके ओलिताखाली येत असून या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कालव्याद्वारे व नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
धरणातून सासवड शहरासह लोणंद औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जात आहे.अनेक उपसा सिंचन योजना या धरणावर अवलंबून आहेत.
नदीत पाणी सोडलेले नाही
वीर धरणांमध्ये 6 टीएमसी म्हणजे 60 टक्के पाणीसाठा धरणातील उजव्या कालव्यातून पाणी विसर्ग बंद असून डावा कालव्याद्वारे 500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदीवरील चार धरणांच्या पाणीसाठा झपाट्याने वाढ होत असून भाटघर धरण 56, नीरा देवघर 70, गुंजवणी धरण 60 टक्के भरले असून या तीनही धरणातून नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही.