नवी दिल्ली-“वीर बाल दिवस हे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही सीमा न बाळगता धाडस करण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिवस’ या कार्यक्रमाला संबोधित करत होते. श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंहजी, यांच्या हौतात्म्यास वंदन म्हणून २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी श्री गुरू गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्व या दिवशी, पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार आज पहिला वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पंतप्रधानांनी मुलांनी सादर केलेले पठण आणि मार्शल आर्टची तीन प्रदर्शने पाहिली. यावेळी पंतप्रधानांनी दिल्लीतील तरुणांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
गुरु गोविंद सिंग जी आणि त्यांच्या चार वीर साहिबजादांचे धैर्य आणि आदर्श आजही प्रत्येक भारतीयाला प्रोत्साहित करत आहे. वीर बाल दिवस ही अतुलनीय धैर्याने शूरवीरांना जन्म देणाऱ्या त्या मातांना राष्ट्रीय श्रद्धांजली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी बाबा मोती राम मेहरा यांच्या कुटुंबाने केलेल्या बलिदानाचे आणि दिवाण तोडरमल यांच्या समर्पणाचे स्मरण केले. गुरुंप्रती असलेली ही खरी भक्ती, राष्ट्राप्रती भक्तीची ज्योत प्रज्वलित करते, असे पंतप्रधान म्हणाले.
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिराती आणि ग्रीस या देशांनी वीर बाल दिवसाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आता वीर बाल दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. चमकौर आणि सरहिंदच्या लढाईच्या अतुलनीय इतिहासाचे स्मरण करून, हा इतिहास विसरता येणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीयांनी क्रूरता आणि तानाशाहीला सन्मानाने कसे तोंड दिले याची त्यांनी आठवण केली.
युवा पिढीकडून देशाला सर्वात जास्त अपेक्षा…
आज देशातील युवकांची संख्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात असलेल्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे,आणि ही सध्याची युवा पिढी देशाला विक्रमी उंचीवर नेऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्ञानाच्या शोधातील सर्व अडथळे दूर करणारा नचिकेत, लहान वयात चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू, ध्रुव आणि त्याची तपश्चर्या, अगदी लहान वयात साम्राज्याचे नेतृत्व करणारा मौर्य राजा चंद्रगुप्त, एकलव्य आणि त्यांचे गुरू द्रोणाचार्य, खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, कनकलता बरुआ, राणी गैयदिनल्यू, बाजी राऊत तसेच देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या इतर अनेक राष्ट्रीय वीरांचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.