नवी दिल्ली – कॉंग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती आणि जागावाटप निश्चित करण्याच्या उद्देशातून पक्षांतर्गत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यातून कॉंग्रेस श्रेष्ठींनी मंगळवारी विविध राज्यांतील नेत्यांशी चर्चा केली. त्यातून इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरळितपणे व्हावी यासाठी कॉंग्रेस लवचिक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या बिहार, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाखमधील नेत्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेतल्या. त्यावेळी राहुल गांधी, के.सी.वेणुगोपाल हे नेतेही उपस्थित होते. बिहारशी संबंधित बैठकीत त्या राज्यातील सुमारे ४० नेते सहभागी झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी एकप्रकारे पक्षाच्या भूमिकेचे सूतोवाच केले.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील ९ जागा मागील वेळी कॉंग्रेसने राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा घटक म्हणून लढवल्या. यावेळी जेडीयूही आमच्या समवेत आहे. त्यामुळे १-२ जागा इकडे-तिकडे होतील. पण, काही हरकत नाही. जागावाटपाविषयी आम्ही लवचिक असू, असे ते कॉंग्रेस किती जागा लढवणार याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याआधीच इंडियाच्या जागावाटपाविषयी सूचक भाष्य केले. खुल्या मनाने आणि तोंड बंद ठेऊन आम्ही जागावाटपाची प्रक्रिया पुढे नेऊ, असे त्यांनी म्हटले. त्यातून जागावाटपाच्या मुद्द्यावर प्रसंगी पडती भूमिका घेण्यास कॉंग्रेस तयार असल्याचे मानले जात आहे.