चंदेरी दुनियेवर वर्ष 1935 ते 1985 या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये वर्चस्व ठेवलेले राज कपूर यांचा आज स्मृतिदिन (2 जून 1988). त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे वर्ष 1930 मध्ये मुंबईला स्थलांतरित झाले. त्यावेळी राज कपूर फक्त 6 वर्षांचे होते. त्यांचे बालपण पेशावर येथे व शिक्षण मुंबई येथे झाले. वडील चित्रपट अभिनेते व निर्माते होते. साहजिकच लहानपणापासून त्यांच्यावर अभिनयाचे अप्रत्यक्ष संस्कार झाले होते.
वर्ष 1935 मध्ये, वयाच्या 11व्या वर्षी राज कपूर यांनी “इन्कलाब’ या चित्रपटात अभिनय केला होता. सुरुवातीस ते बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये मदतनीस म्हणून काम करायचे. नंतर त्यांनी केदार शर्माबरोबर क्लॅपर बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वर्ष 1943 मध्ये सहकलाकार म्हणून “हमारी बात’ या चित्रपटातून अभिनेते म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. वर्ष 1947 मध्ये त्यांनी एकूण चार चित्रपटांत भूमिका केली. त्यापैकी “नीलकमल’ या चित्रपटामध्ये मधुबालाबरोबर नायक म्हणून पडद्यावर पदार्पण केले व त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अभिनयाबरोबर दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही जम बसविला.
वर्ष 1948 मध्ये त्यांनी “आरके फिल्म्स्’ या नावाखाली चित्रपट निर्मिती संस्था उभारून चेंबूर येथे भव्य स्टुडिओ उभारला. या स्टुडिओमध्ये बगीचा, बाजार, धबधबे, मंदिरे, तलाव, म्युझिक हाऊस, फिल्म प्रोसेसिंग अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता. त्यामुळे सर्वकाही एकाच छताखाली असायचे. काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत याचे मोठे नुकसान झाले. हा स्टुडिओ वर्ष 2018 मध्ये गोदरेज कंपनीने विकत घेतला.
आरके फिल्म्स्ची स्थापना झाल्यावर सुरुवातीस एक दोन चित्रपटांना यश मिळाले नाही. पण वर्ष 1949 मध्ये “बरसात’ पडद्यावर आला व त्यानंतर एकापाठोपाठ आवारा, बूट पॉलिश, जागते रहो आणि श्री 420 यासारखे चित्रपट यशस्वी होऊ लागले. त्यांच्या चित्रपटांना जगभर मागणी येऊ लागली. विशेषकरून रशियात व चीनमध्ये त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले.
नर्गिस व त्यांची जोडी जमली होती. त्या दोघांनी 15 चित्रपटांत काम केले. राज कपूर दिग्दर्शन अत्यंत बारकाव्याने करीत असत. त्यामध्ये प्रेम, कुटुंब, समाज, भूतकाळ, वर्तमान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न असायचा. सिनेमातील गाण्यांमुळे चित्रपट हिट होतो, हे लक्षात घेऊन गीत लिहून घेतले जात असे. तसेच त्याला सुरेल संगीताची व आवाजाची जोड याकडे विशेष लक्ष दिले जात असे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांतील गाणी बिनाका गीतमालेवर सरताज व्हायची तसेच बॉक्स ऑफिसवरही चलती असायची. गायक मुकेश हा त्यांचा आवाजच बनला होता. श्री 420 मधील गाणीही अशीच प्रेक्षकांना भुरळ पाडून गेली. त्यांच्या गाण्यात व चित्रपटांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सहिष्णुता जपलेली असे. भारत सरकारने त्यांना वर्ष 1971 मध्ये पद्मभूषण आणि वर्ष 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते.
– माधव विद्वांस