वन्यजीव अभ्यासक, शिकार कथा लेखक जिम कॉर्बेट यांचा आज स्मृतिदिन. भारतामध्ये अभयारण्याची मूळ कल्पना जिम कॉर्बेट यांचीच. आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले जिम कॉर्बेट यांचा जन्म 25 जुलै 1875 रोजी हिमालयाच्या कुमाऊँ पर्वतरांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. त्यांचे वडील क्रिस्टोफर हे नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून रूजू झाले होते.
जिम कॉर्बेट त्यांचे आठवे अपत्य. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. तेथे उन्हाळी सुट्ट्यांसाठी सर्व कुटुंबीय वास्तव्यास येत असत. त्यामुळे लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण वाटू लागले. झाडावर बसून जंगलाचे निरीक्षण करण्याचा त्यांना छंद होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबीय तेथेच राहिले. त्यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूलमध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना वायव्य रेल्वेच्या पंजाबमध्ये नोकरी मिळाली.
जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्यजीवांची संख्या कमी होत चालली आहे, ही गोष्ट जंगलात फिरणाऱ्या व निरीक्षण करणाऱ्या जिम कॉर्बेट यांच्या लक्षात आली. जिम कॉर्बेट यांच्या प्रयत्नातून भारतात वन्यजीवांना सुरक्षित राहता यावे म्हणून अभयारण्ये घोषित करण्यात आली. पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानाचे वर्ष 1957 मध्ये “कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ असे नामांतरण करण्यात आले.
उत्तराखंडमधील जंगलात 30 वर्षांमध्ये (1907 ते 1938 या काळात) सुमारे दीड हजार लोकांना वाघ आणि बिबट्यांनी भक्ष्य बनविले होते. चंपावतच्या नरभक्षक वाघाने 436 लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने 400 लोकांचे बळी घेतले होते. असे नरभक्षक डझनभर वाघ आणि बिबट्यांना जिम कॉर्बेट यांनी मारले. त्यांनी फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांचीच शिकार केली. सहसा वाघ माणसावर आपणहून हल्ला करीत नाही तसेच सर्वच श्वापदे नरभक्षक नसतात. एखादा माणूस आपल्यावर हल्ला करीत आहे, असे वाघास वाटले तरच तो हल्ला करतो व त्याच्या जिभेला मानवी रक्ताची चटक लागते त्यामुळे तो नरभक्षक बनतो. त्यांनी वाघाच्या सवयीचे निरीक्षण करून आसपासच्या गावातील लोकांना वाघापासून कशा पद्धतीने दूर राहायचे हे समजून सांगितले तसेच आपल्या पुस्तकातून याबाबत सविस्तर सांगितले. त्यांच्या थरारक अनुभवातून नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे 27 भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.
जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केनियातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय जंगलात निरीक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर 5-6 फेब्रुवारी 1952 या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी राहिल्या होत्या. “ट्री टॉप्स’ या पुस्तकात त्यावेळच्या एका आठवणीत ते लिहितात, मचाणावर चढताना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरताना इंग्लंडची महाराणी झाली. कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले.
कुमाऊँचे मानव भक्षक, माझा भारत, द टेंपल टायगर अँड मोअर मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊँ, रुद्रप्रयागचा मानव खाणारा बिबट्या ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. 19 एप्रिल 1955 रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस