– माधव विद्वांस
स्वातंत्र्यसैनिक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक, पर्यावरणवादी आचार्य कृपलानी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील सिंधमधील हैदराबाद येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जीवतराम भगवानदास कृपलानी. पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी काही काळ शाळेत शिक्षक म्हणून काम केले. 1919-20च्या दरम्यान ते बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. पुढे गुजरात विद्यापीठाचे आचार्य झाल्यापासून आचार्य कृपलानी या नावानेच ओळखले जाऊ लागले.
महात्मा गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत ते सामील झाले तसेच त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध साहित्य प्रकाशित केले. सविनय कायदेभंगाच्या चळवळींमध्ये अनेक प्रसंगी त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील गांधींच्या आश्रमांमध्ये सामाजिक सुधारणा आणि शिक्षणाच्या कार्यावर काम केले आणि नंतर त्यांना नवीन आश्रम स्थापन करण्यासाठी तत्कालीन बिहार आणि उत्तर भारतातील संयुक्त प्रांतात पाठविण्यात आले. त्यांनी बनारस येथे 1920 मध्ये गांधी आश्रमाची स्थापना केली आणि खादी व ग्रामोद्योग या गांधींच्या कार्यास वाहून घेतले.
वर्ष 1936 मधे त्यांनी सूचेता मजुमदार या निष्ठावान काँग्रेस कार्यकर्तीशी विवाह केला. सूचेता कृपलानी उत्तर प्रदेशाच्या 1963 ते 1967च्या दरम्यान मुख्यमंत्री होत्या.स्वातंत्र्यानंतर दोघेही वेगळ्या पक्षाचे काम करीत पण एकत्र राहत होते. मात्र 1950च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंनी पाठिंबा दिलेल्या कृपलानी यांचा सरदार पटेलांचे उमेदवार पुरुषोत्तम दास टंडन यांनी पराभव केला. ते आपल्या पराभवामुळे दुखावले गेले आणि त्यांनी काँग्रेस सोडली आणि किसान मजदूर प्रजा पक्षाच्या संस्थापकांपैकी एक बनले.
या पक्षाचे पुढे सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होऊन प्रजा सोशालिस्ट पार्टीची स्थापना झाली. पुढे ते प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले तथापि याही पक्षाशी त्यांचे 1954 नंतर पटले नाही. म्हणून त्यांनी तोही पक्ष सोडला. त्यांनी वर्ष 1946 मधे व्हिजिल हे राजकीय साप्ताहिक सुरू केले होते. ते अनुक्रमे लोकसभेचे 1952, 57, 63 व 67 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले.
ते जातीव्यवस्थेचे विरोधक होते. एकदा रेल्वे प्रवास करीत असताना एका माणसाने पुस्तक वाचत असलेल्या आचार्य कृपलानी यांना विचारले की, महोदय, आपण कोणत्या जातीचे आहात? या प्रश्नावर माझी कोणतीही एकच जात असती, तर मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो असतो, असे प्रत्युत्तर आचार्यांनी दिले. कृपलानींनी गांधीवादी विचारसरणीतून स्फुट लेखनाबरोबर पुस्तकेही लिहिली.
त्यांपैकी द गांधियन वे, द नॉन-व्हायलंट रेव्होल्यूशन द पॉलिटिक्स ऑफ चरखा, द फ्यूचर ऑफ काँग्रेस, द लेटेस्ट फॅड : बेसिक एज्युकेशन, द गांधियन थॉट, गांधी-द स्टेटस्मन, सरप्लस व्हॅल्यू, प्लधनिंग, गांधी : हिज लाइफ अँड थॉट वगैरे काही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
आचार्य कृपलानी यांचे 19 मार्च 1982 रोजी अहमदाबाद येथे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले.