RCB Win WPL 2024 – महिला प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला व विजेतेपद पटकावले. आता बंगळुरु संघावर पारितोषिकांचा वर्षाव सुरु झाला आहे. अंतिम सामन्यानंतर बेंगळुरू आणि दिल्ली संघाला मोठी बक्षीस रक्कमही मिळाली.
विशेष म्हणजे पाकिस्तान सुपर लीगमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेपेक्षा बेंगळुरू आणि दिल्लीला मिळालेली बक्षीस रक्कम जवळपास दुप्पट आहे. बंगळुरू संघाला ६ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ कोटी रुपये देण्यात आले. गेल्यावर्षीच्या विजेत्या मुंबई इंडियन्सलाही ६ कोटी रुपये मिळाले होते, तर दिल्ली कॅपिटल्सलाही ३ कोटी रुपये देण्यात आले होते. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या विजेत्याला यंदा भारतीय चलनानुसार ३.५ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच उपविजेत्याला भारतीय चलनानुसार १.४ कोटी रुपये मिळणार आहेत.
आयपीएल जिंकणाऱ्या संघाला महिला संघापेक्षा दुप्पट बक्षीस मिळते. आयपीएल विजेत्याला २० कोटी रुपये, तर उपविजेत्याला १२.५ कोटी रुपये मिळतात. महिलांच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीने बेंगळुरूसमोर विजयासाठी ११४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बेंगळुरूने १९.३ षटकात २ गडी गमावत ११५ धावा करून सहज पूर्ण केला.
बेंगळुरूकडून एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या, तर सोफी डिवाईनने ३२ आणि कर्णधार स्मृती मानधनाने ३१ धावा केल्या. ऋचा घोषने नाबाद १७ धावा केल्या. दिल्लीकडून शिखा पांडे आणि मन्नू मनी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. त्यापूर्वी, दिल्लीला प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्वबाद ११३ धावाच करता आल्या होत्या. दिल्लीकडून शफाली वर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली, तर कर्णधार मेग लेनिंगने २३ धावा केल्या. बंगळुरूकडून गोलंदाजी करताना श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर सोफी मेलिनेक्सने ३ बळी मिळवले.
WPL 2024 : आरसीबीच्या विजेतेपदात ‘या’ 5 खेळाडूंचे योगदान होते महत्त्वाचे…
कोहलीने केला व्हीडीओ कॉल
बंगळुरु संघाने विजेतेपद पटकावल्यावर काही क्षणातच रॉयल चॅलेंजर बंगळुरु पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीने थेट स्मृती मानधनाला व्हीडीओ कॉल केला. कोहलीने संघाचे अभिनंदन केले तसेच तुम्ही केलेल्या कामगिरीचा सर्वाधिक आनंद होत आहे, असेही म्हटले. त्याचवेळी आम्ही देखील यंदाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून गेल्या १६ वर्षांचा दुष्काळ संपवू, असा निर्धारही कोहलीने व्यक्त केला.अलीकडेच विराट कोहली भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत खेळला नाही.