माधव विद्वांस
तामिळी भाषिक असूनही मराठीमध्ये गायनाचा ठसा उमटविणाऱ्या वाणी जयराम यांचे आज अभीष्टचिंतन. त्यांचा जन्म तामिळनाडूत वेल्लोर येथे 30 नोव्हेंबर 1943 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव कलाईवनी होते. त्यांना “आधुनिक भारताची मीरा’ असेही म्हणतात. त्यांच्या घरातील वातावरण संगीतमय होते. शास्त्रीय प्रशिक्षित संगीतकारांच्या तामिळ कुटुंबात सहा मुली आणि तीन मुलगे होते. त्यांनी आई पद्मावती व रंगा रामुनाज अय्यंगर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे घेतले. त्यांनी कुडलोरे येथील श्रीनिवास अय्यंगर, टी. आर. बालसुब्रमण्यम आणि आर. एस. मणी यांच्याकडे कर्नाटक संगीताचा अभ्यास केला.
तेलुगू चित्रपट आणि भक्तिगीतांच्या बाबतीत वाणी यांचे योगदान व्यापक आहे. वर्ष 1973मध्ये अभिमनवंथुलू चित्रपटासाठी त्यांनी पहिले तेलुगू गाणे रेकॉर्ड केले. एस. पी. कोदानंदानी यांनी संगीतबद्ध केलेले “आप्तेपालेकादुरा ना स्वामी’ हे गाणे शास्त्रीय नृत्य आधारित गाणे होते. वर्ष 1975मध्ये पूजा या चित्रपटातील गाण्यांनी त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यांचा जयराम यांच्याशी विवाह झाल्यावर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या. तमिळी, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, हिंदी व मराठीमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली. मुंबईत आल्यावर त्यांनी पतियाळा घराण्याच्या उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकले. संगीत शिक्षण, रियाज या गोष्टीमुळे त्यांनी बॅंकेतील नोकरी सोडली.
त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. तसेच गुजरात (1975) तामिळनाडू (1980) आणि ओडिशा (1984) कडून सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचे पुरस्कार मिळाले.वर्ष 2012मध्ये त्यांना दक्षिण भारतीय चित्रपट संगीतातील कामगिरीबद्दल फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- साउथने गौरविण्यात आले. जुलै 2017 मध्ये त्यांना न्यूयॉर्क शहरातील नाफा कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट महिला गायकाचा बहुमान देण्यात आला. “ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी’ या गाण्याने मराठी रसिकांना लुब्ध केले. “बलसागर भारत होवो’ हे साने गुरुजींचे गीत आकाशवाणीसाठी त्यांनी सुधीर फडके यांच्याबरोबर आकाशवाणी समूहासोबत गायले. सून माझी सावित्री या चित्रपटातील “उठा उठा हो सूर्यनारायणा’ हे जगदीश खेबूडकरांचे गीतही त्यांनी गायले. वर्ष 1971 “बोल रे पपीहा’ हे गुलजार यांचे गुड्डी चित्रपटातील गीत त्यांनी गायले व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव एकदम उंचावले. “मीरा’मधील “मेरे तो गिरधर गोपाल’ गाण्याला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी त्यांनी 12 भजने गायली. दहा हजारांपेक्षा जास्त विविध भाषांतील गाणी त्यांनी गायली. लोकप्रिय गायिकेचे अभीष्टचिंतन.