पुणे- “आपल्या देशाची संस्कृती भगवान महावीर, गौतम बुद्ध, भगवद्गीतेच्या तत्वज्ञानावर आधारित अशी जागतिक कल्याणाची संस्कृती आहे. जगातील आजची स्थिती तणावपूर्ण आहे. विश्व कल्याणचा विचार भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आजच्या काळात मूल्यधिष्ठीत जीवन पद्धतीचे आचरण करणे आवश्यक आहे,’ असे मत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
“जीतो कनेक्ट 2022′ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जीतो ऍपेक्सचे अध्यक्ष सुरेश मुथा, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला, मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी, जीतो ऍपेक्सचे उपाध्यक्ष महावीर चौधरी, उपाध्यक्ष पारस भंडारी, संचालक इंदर छाजेड, रमेश गांधी, जीतो युथ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज छाजेड, रोम झोनचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, रोम जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, मुख्य सचिव अजय मेहता, ऍड. एस के जैन, अशोक हिंगड, अजित सेठिया, राजेंद्र बाठिया, हितेश शहा आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “जीवनात संकट, समस्या अनेक येतात. परंतु समस्यांना संधीत रुपांतरित करून त्याचा उपयोग करण्याची आणि देशाला “सुपर पॉवर’ बनविण्याची ताकदसुद्धा जैन समाजात आहे. जैन समाज नोकरी मागणारा नसून नोकरी देणारा आहे. देशाच्या निर्माणासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. जगाची काळजी करताना आपण देशाची ही काळजी करावी लागते. आत्मनिर्भर भारताकरीता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेली स्वदेशी वस्तू वापरण्याचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणला गेला पाहिजे. एकविसावे शतक भारताचे असून आपण त्यादृष्टीने प्रयत्नशील राहावे. आपल्याकडे किती साधन संपत्ती आहे यापेक्षा आपण कुटुंबातील सदस्य एकमेकांना किती समजून घेत एकत्रित राहतो ही बाब महत्वपूर्ण आहे.’
यावेळी बोलताना गणपतराज चौधरी म्हणाले, “कोविड काळात अनेक उद्योगांना फटका बसला पण जीतोचे सदस्य यादरम्यान दुपटीने वाढले असून 900 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक क्षमता वाढलेली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास जीतो आत्मनिर्भर झाला आहे. कोविड काळात पंतप्रधान रिलीफ फंड मध्ये सर्वाधिक मदत करणारा जीतो आहे. जवळपास 25 लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच येत्या काळात “श्रावक उन्नती’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित गरजू मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार आहे. जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी जीतो पुणे टीमचे कौतुक केले. जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला यांनी सर्व टीमला धन्यवाद दिले.
यावेळी राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांचा लिखित शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. उद्योजक धरिवाल, नरेंद्र बलदोटा, सुरेश मुथा, शांतीलाल कवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. तर, पंकज कर्णावट यांनी आभार मानले.
कोविड काळात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि नवीन संधीविषयी जागरुक होण्यासाठी जीतो कनेक्ट आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन महत्वपूर्ण ठरणार आहे. जीतो पुणे चॅप्टरच्या सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी केला आहे. युवा पिढी व महिलांनी खूप चांगले योगदान दिले आहे.
– विजय भंडारी, व्हाइस चेअरमन, जीतो