पिंपरी – शहरात गेल्या दोन वर्षांपासून दिवसाआड पाणी कपात होत आहे. काही भागात पाणी पुरवठ्याच्या वेळा देखील अशा आहेत की ज्या घरात पती-पत्नी दोघेही कामाला जातात, त्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यावर्षी पाणी टंचाई अधिकच तीव्र झाल्याने मागणी वाढली आणि पाणी व्यावसायिकाने संधीचा फायदा घेत पाण्याचे दरही वाढविले. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरामध्ये पाण्याच्या जारचे दर यंदा 50 रुपयांवरुन 65 ते 70 रुपयांवर पोहचले आहेत.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने 520 एमएलडी पाणी पुरवले जाते. एकदिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचे टॅंकर फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहेत. यंदा टॅंकरचे दरही वाढविण्यात आले आणि आता त्यापाठोपाठ पिण्याच्या पाण्याचे 20 लिटरचे जारही महागले.
अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत आहे. तर काही ठिकाणी अशुद्ध पाण्याच्या पुरवठा होत आहे. त्यामध्येच वाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून पाण्याची मागणीही वाढली आहे. धरणात मुबलक पाणी साठा असूनही वाढत्या मागणीनुसार पाणी पुरवण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांना टॅंकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरची मागणी वाढत आहे.
शहरामध्ये सद्यस्थितीत एक लिटर बॉटलसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत. तर 20 लिटरच्या बॉटलसाठी 60 ते 65 रुपये आणि घरपोच असल्यास 70 रुपये मोजावे लागत आहेत. मागील वर्षी या जारची किंमत 50 रुपये होती.
आता पिण्याचेही पाणी महागलेबोअरवेल आटले असल्याने शेवटचा पर्याय
महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक सोसायटी व मिळकतधारकांनी परिसरामध्ये बोअरवेल घेतले. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी अनेकांनी कर्ज काढून हा पर्याय स्वीकारला. मात्र, अनेक बोअरवेलचे पाणी पिण्यालायक नसल्याने तहान भागविण्यासाठी नागरिक मिनरल वॉटरचा वापर करू लागले आहेत.