सादिक सय्यद
पाचगणी – जावळी तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व 17 आरोग्य उपकेंद्रांमध्ये मंजूर 160 पदांपैकी 47 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या दुर्गम व डोंगराळ तालुक्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. करोनाशी लढताना जावळीत आरोग्य विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने येथे करोनाचा मुत्युदर चढता राहिला आहे, असे बोलले जात आहे.
जावळी तालुक्यात मेढा व सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालये, केळघर, बामणोली, सायगाव, कुसुंबी, कुडाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे व 24 आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व 17 आरोग्य उपकेंद्रांमध्ये 47 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये तरंगत्या पथकातील एक वैद्यकीय अधिकारी, दोन विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एक आरोग्यसेवक, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्र व कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक महिला आरोग्य सहाय्यक, सायगाव आरोग्य केंद्र, दरे खुर्द आरोग्य उपकेंद्र, हातगेघर उपकेंद्र, खर्शी उपकेंद्र, तेटली उपकेंद्र, बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्र, केडंबे उपकेंद्र, केळघर उपकेंद्र
कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरोशी उपकेंद्र, भणंग उपकेंद्र, आपटी उपकेंद्र येथे एकूण 12 आरोग्यसेविका, दापवडी व कुडाळ उपकेंद्रात दोन आरोग्यसेवक, तरंगत्या पथकात एक औषध निर्माण अधिकारी, बामणोली, केळघर व कुडाळ आरोग्य केंद्रांमध्ये तीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बामणोली, कुसुंबी व कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तीन कनिष्ठ लिपिक, कुसुंबी व कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन परिचारिका, केळघर, कुसुंबी, बामणोली व कुडाळ आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन पुरुष परिचर, सायगाव येथे एक पुरुष परिचर, कुडाळ, कुसुंबी, सायगाव व बामणोली आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी एक सफाई कामगार, अशी 47 रिक्त पदे आहे.
पाचही आरोग्य केंद्रांमधील वाहनचालकांची पदे रिक्त असून त्यापैकी चार ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर वाहनचालक नियुक्त केले आहेत. बामणोली आरोग्य केंद्रासाठी तर वाहनच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. करोनाच्या संकटातही शासनाकडून ही पदे भरण्यात आली नसल्याने आरोग्य यंत्रणेवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून अतिरिक्त ताण येत आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला नाहक सामोरे जावे लागत आहे. करोनाच्या काळात ही अवस्था असल्याने तालुक्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याची प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. रिक्त पदे भरण्यात शासनाची उदासीनता असल्याने सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी
होत आहे.