दुबई – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सुमार कामगिरीवर विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक फलंदाज म्हणून कोहलीने जो दर्जा सिद्ध केला आहे तो दर्जा त्याने एक कर्णधार म्हणून संघाला मिळवून दिलेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फलंदाज अशी कोहलीची ख्याती आहे. त्याने पदार्पणापासूनच आपल्या खेळाची एक उंची कायम ठेवली आहे. आज भारतीय संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज अशी ख्यातीही त्याने सिद्ध केली आहे.
मात्र, हाच दर्जा त्याला बेंगळुरूचे नेतृत्व करताना राखता येत नसल्याचेही दिसून येत आहे. बेंगळुरूच्या गेल्या 13 वर्षांच्या वाटचालीत सातत्याने निराशाजनक कामगिरीचे हेच एक मोठे कारण आहे असे मला वाटते.
जर कोहली फलंदाज म्हणून जसे यश मिळवताना दिसतो, तसेच यश त्याने नेतृत्व करतानाही सिद्ध केले असते तर बेंगळुरूची कामगिरी निश्चितच उंचावलेली दिसली असती, असेही गावसकर म्हणाले.