देहरादून – उत्तरकाशीमध्ये रविवारी संध्याकाळी 7.45 वाजता चारधाम यात्रेकरूंनी भरलेली बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. यातील 23 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बस चालक, ऑपरेटर आणि मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील जाखला गावचे रहिवासी 28 यात्रेकरू बसमध्ये होते. हा अपघात यमुनोत्री महामार्गावर दामट्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या रिखांव खड्डा परिसरात झाला. बस हरिद्वारहून यमुनोत्री धामसाठी निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच बरकोट आणि पुरोळा पोलिसांसह एसडीआरएफ, एनडीआरएफची टीम पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले.
पुरोला पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, सात जखमींना वाचवण्यात यश आले असून त्यात तीन महिला आहेत. त्यांना उपचारासाठी सीएचसी नौगाव येथे दाखल करण्यात आले. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार जखमींवर उपचार सुरू आहेत.
खोल खड्डा आणि अंधारामुळे मृतदेह रस्त्यावर आणणे अवघड झाले होते. अपघात इतका भीषण होता की बसचा चक्काचूर झाला. एसडीएम बरकोट शालिनी नेगी, सीओ सुरेंद्र भंडारी घटनास्थळी उपस्थित होते.
जिल्हा पंचायत सदस्य हकमसिंग रावत हे यमुनोत्री महामार्गावरील रिखांव खड्ड्याजवळ झालेल्या बस अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे अंगावर शहारा आणणारा प्रसंग होता. अपघातानंतर बसचे तुकडे झाले होते. प्रवाशांचे मृतदेह झाडाला लटकलेले होते. कुणाचा हात तर कुणाचा पाय गायब होता. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेला हकम कसेतरी दरीत उतरले. त्यांनी तातडीने डीएम, एसपी आणि सीओ यांना घटनेची माहिती दिली.
हकम सिंह रावत यांनी सांगितले की ते रविवारी डेहराडूनहून उत्तरकाशीला रवाना झाले होते. अपघाताचा बळी ठरलेली बस त्यांच्या पुढे जात होती. त्यांना बसला ओव्हरटेक करायचे होते. मात्र सतत येणाऱ्या वाहनांमुळे ते पुढे जाऊ शकले नाही.
दरम्यान, बस पुढे जात असताना तिचे स्टेअरिंग बिघडले किंवा ड्रायव्हरला डुलकी लागल्यासारखे झाले. बस थेट दरीत कोसळली. अपघातानंतर हकमसिंग त्यांच्या काही साथीदारांसह त्या दरीत उतरले, जिथे लोकांचे मृतदेह झाडांना लटकले होते. प्रवाशांचे सामान आजूबाजूला विखुरलेले होते. त्यांनी घटनास्थळावरून अपघातस्थळाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली.