लखनौ: उत्तर प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री कमलराणी वरूण यांचे करोनामुळे निधन झाले. त्या 62 वर्षाच्या होत्या.
करोनामुळे मरण पावलेल्या त्या उत्तर प्रदेशमधील पहिल्या मंत्री आहेत. त्यांना मधुमेह, रक्तदाबाचे विकार होते, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांना 18 जुलैला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. सुरवातीला त्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकशास्त्र संस्थेत हलवण्यात आले.
गांधी रुग्णालयात त्यांना आणण्यात आले त्यावेळी त्यांना ताप, खोकला आणि श्वसनास अडथळा येत होता. त्यांची करोना चाचणी 18 जुलैला पॉझिटिव्ह आली होती. त्यांना दाखल केल्या केल्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तेथेही त्यांना तीव्र लक्षणे दिसू लागल्याने त्यांना रेमडेसेवीर आणि टॉसिलिझूमब चे डोस देण्यात आले होते. त्यांच्यावर एम्सचे संचालक प्रा. रणदीप गुलेरीया आणि प्रा रितेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. मात्र त्यांचे दोन ऑगस्टला सकाळी साडे नऊच्या सुमारास निधन झाले, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
कमलराणी या कानपूरमधील घातमपूर मतदार संघातून आमदार झाल्या होत्या. तर यापुर्वी दोनवेळा त्यांनी कानपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजचा अयोध्या दौरा रद्द केला.