जालना – 2016 मध्ये मराठा समाजाचे शांततेत 58 मोर्चे निघाले. याचे साक्षीदार जग आहे. पण काल जे घडले ते सरकारच्या माध्यमातून अमानुष कृत्य आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यातील घटनेवर संताप व्यक्त केला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराटी गावाला आज सकाळीच त्यांनी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांची भेट घेत काल घडलेल्या घटनेबाबत माहिती जाणून घेतली.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, जालन्यात घडलेले कृत्य हे सरकारच्या माध्यमातून घडविण्यात आलेले अमानुष कृत्य आहे. मराठा समाजावर अन्याय होत असल्याने मी अनेक दिवसांपासून लढत आहे.
2016 मध्ये मराठा समाजाचे शांततेत 58 मोर्चे निघाले. याचे साक्षीदार जग आहे. पण काल जे घडले ते सरकारच्या माध्यमातून अमानुष कृत्य घडवल्याचे संभाजीराजेंकडून सांगण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या राज्यात असे होत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलकांवर गोळ्या झाडता. हे काय मोगलांचे, निजामांचे राज्य आहे का?
तुमचे सरकार दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे, आम्हाला सांगा आणखी किती दिवस आरक्षणाचा लढा द्यायचा? आम्हाला आरक्षण कसे देणार ते पहिले सांगा, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.