बाजारात मिळणारे मीठ हे समुद्रापासून बनलेले असते. ते शतप्रतिशत सोडियम क्लोराइड असले तरी त्यात पोटॅशियम आयोडाइड मिसळले जाते. काही वेळा साध्या मीठाऐवजी शेंदेमीठ वापरले जाते. यात सोडियम क्लोराइडच्या जोडीला पोटॅशियम व मॅग्नेशियम क्लोराइड आणि सल्फेटस् असे इतरही रेणू असल्यामुळे सोडियमचे सेवन कमी होते.
बाजारात मिठाऐवजी कृत्रिम मीठ वापरण्याकरिता मिळते त्यातही सोडियमचे अणू अत्यल्प प्रमाणात असतात. या पदार्थांचे सेवन करणे योग्य अथवा अयोग्य हे रुग्णाच्या मूत्रपिंडाच्या आरोग्यावर व इतर घटकांवर अवलंबून असते.
मीठ कमी किंवा जास्त खाणे यातला बराच भाग सवयीचा असू शकतो. एकदा मीठ कमी घेण्याची सवय लागली म्हणजे असे अन्न घेणे जड जात नाही. साधारणपणे 3 महिने कमी मिठाचे अन्न घेणाऱ्या व्यक्तीची मीठ जास्त घेण्याची वासना जाते. ज्यांचा रक्तदाब जास्त असतो अशा व्यक्तींमध्ये मीठ जास्त घेण्याची इच्छा अधिक प्रबळ असते.
अशा व्यक्तींनी आपल्या आहारातील मिठावर नियंत्रण ठेवल्याने त्यांचा रक्तदाब लक्षणीय प्रमाणात कमी होतो. आहारातील सोडियम पूर्णपणे वर्ज्य करणे कठीण असते, कारण आपल्या आहारातील पदार्थांतच थोड्या फार प्रमाणात सोडियम क्षार असतोच.
विशेषत: अंड्यातील पांढरा बलक, सुका मेवा, मटण, मासळी, कोंबडी, लिव्हर, भेजा, दूध, चीज, बीटरूट, गाजर, रॅडिश, पालक, नवलकोल, इत्यादी आहार घटकांतच सोडियमचा अणू विपूल प्रमाणात या सर्व पदार्थांवर मर्यादा आणणे किंवा पूर्णत: वर्ज्य करणे असे केल्याखेरीज सोडियम वगळता येणार नाही.
मिठाबरोबर तिखटाचा विचार भारतीय आहारात केला पाहिजे. आहारातील मसाले, तिखट आणि मीठ यांचे चवीच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहेच. हे पदार्थ चवीपुरते वापरून होणारे फायदे आणि अतिरेकाने वापरण्याने होणारे तोटे खूप असतात. जठराचा अस्तराचा दाह, अतिरेकी आम्लपित्त, पेप्टिक अल्सर अशा आजारात मसालेदार किंवा तिखटा-मिठाचा अतिरेक असणारा चमचमीत आहार वर्ज्यच करावा लागतो.
यकृताच्या आजारातसुद्धा मसालेदार अन्न शक्यतो टाळावे, असा सल्ला दिला जातो. लहान मुलांचा तसेच वयोवृद्ध व्यक्तींचा आहारदेखील सौम्यच असावा. आपल्या आहारातील विविध अन्नघटकांत सोडियमचे प्रमाण कमी जास्त असते. एखादा अन्नघटक आपण किती प्रमाणात घेतो आणि किती वेळा घेतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
– डॉ. एस. एल शहाणे