पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण उदरनिर्वाहासाठी ठिकठिकाणी रवाना
बिदाल – दिवाळी संपली अन् माण तालुक्यातील स्थलांतराने वेग घेतला. पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात व्यवसायानिमित्त तालुक्याबाहेर ठिकठिकाणी स्थलांतरित होताना दिसत आहे. मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकाम करणारे गाव सोडू लागले आहेत.
माण तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, ऊसतोडणी कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी कराड, सांगली, कोल्हापूर या भागात ऊसतोडणीसाठी जाऊ लागले आहेत.
माण तालुक्यातील जाशी, पांगरी,टाकेवाडी, मोगराळे, वावरहिरे, जांभुळणी, पानवन, कारखेल, वळई इत्यादी गावांतील उसतोड मजूर जाऊ लागल्याने गावेच्या गावे ओस पडू लागली आहेत. माण तालुक्याच्या पूर्व, उत्तर भागात शेतीच्या पाण्याची योजना कायमस्वरूपी कार्यान्वित नसल्यामुळे हजारो एकर माळरानावर असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र अधिक प्रमाणावर पडीकच असते.
परिणामी हातावर पोट भरणारे मजूर, उसतोड कामगार कामधंदा नसल्याने उपाशीतापाशी दिवस काढण्यापेक्षा हालअपेष्टा सहन करीत सहा महिने ऊसतोड करून जीवन जगत असतात. दिवाळीनंतर काही जण स्थलांतराच्या मार्गावर तर अनेकजण व्यवसाय अथवा धंद्याच्या ठिकाणी पोहोचलेही आहेत.
ऊसतोडणी, मेंढपाळ, व्यवसाय व मुंबई, वसई येथे मातीकाम, रंगकाम हे येथील लोकांचे पोटापाण्याचे व्यवसाय आहेत. मेंढपाळ, शेळ्या- मेंढ्यांसह लातूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील अनेक गावी जातात. माण तालुक्यातील पस्तीस टक्के लोक कोल्हापूर-कराड या भागात ऊसतोडणीसाठी जाऊन सहा महिने उदरनिर्वाह करीत असतात.
शेतकरी, मोलमजुरी करणारी हजारो कुटुंब आपली जनावरे शेळ्या, घरातील लहानसहान मुलं, कुत्री, कोंबड्या इत्यादी घेवून ऊसतोडीला जाण्याची परंपरा अजून कायम आहे. माणपूर्व भागात हमखास कामधंदा करण्याचे साधन नसल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतीसह मेंढपाळ व्यवसाय केला जातो किंवा रोजंदारी करून जीवन जगावे लागते.
या भागातील तरुण वर्ग जेमतेम दहावी-बारावीपर्यंत कसंबसं शिक्षण घेतो. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने वसई, मुंबई, पुणे येथे काहीतरी कामधंदा करून किंवा रंगकाम करून आपली व कुटुंबाची उपजीविका करावी लागते.
कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित
ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, ते स्वत:ची बैलगाडी घेऊन लहान मुलंबाळं पत्नी, कोंबड्यांसह ऊसतोडीला जातात. मुले कळती होईपर्यंत सोबतच असतात, मग चौथीपर्यंत त्यांची शाळा म्हणजे सहा महिने ऊसतोडी व सहा महिने शाळा, अशीच त्यांच्या शिक्षणाची अवस्था असते.
मराठी शाळेचे मास्तर पट टिकविण्यासाठी त्या मुलाला पुढे ढकलतात. त्यामुळे आशा मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया कमकुवत होवून पुढील भवितव्य धोक्यात जात आहे. पाचवीत गेला की पुन्हा मुळाक्षरापासून सुरुवात करायची. यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.