पुणे -सरकारी यंत्रणांचा वापर नको असलेला माणूस संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्याचवेळी आरक्षणाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न होत असून
केंद्र आणि राज्य सरकार दोघानांही मान्य असेल आरक्षणाचे घोडे अडले कुठे, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली. शहरात पालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडी करून याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढला होता.
त्यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे? असे विचारले होते.
त्याची आठवण करून देत ठाकरे म्हणाले, फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे? कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही?
तसंच सगळ्यांना व्यासपीठावर एकत्र आणून या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी आलो असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मान्य केले.
खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय
एकनाथ खडसे यांच्या कारवाईबद्दल विचारले असता त्यांच्या सीडीची वाट पाहतोय. सरकारकडून यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हाही असाच वापर करण्यात आला होता.
भाजपाचे सरकार आल्यानंतर तेही असाच वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही, जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा, असे राज ठाकरे म्हणाले.
मी नवी मुंबई विमानतळाला नवं नाव देण्याची मागणी केलेली नाही. उद्या जर मी पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार केला तर माझ नाव राज मोरे होणार नाही. त्यामुळे मुंबई विमानतळ शिफ्ट होत असेल तर नाव कसे बदलेल?
-राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे