नवी दिल्ली – सध्या भारतही पाकिस्तान मॉडेलच्या मार्गावर पुढे जात आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानच्या राजकारणावर आयएसआय नियंत्रण ठेवते, त्याच धर्तीवर देशीात ईडी भूमिका बजावत आहे, असे म्हणत कॉंग्रेस नेते उदित राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
उदित राज म्हणाले, मी भारताची पाकिस्तानशी तुलना करत नाही. पाकिस्तान ही एक असफल लोकशाही आहे. त्यावर आयएसआयचे नियंत्रण आहे. परंतु एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो की, आम्ही भारतीयदेखील पाकिस्तान मॉडेलचे अनुसरण करत आहोत. आपणही त्याच मार्गाने पुढे जात आहोत. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे देशात आयएसआयची भूमिका बजावत आहेत.
ईडीच्या भीतीमुळे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची नावे उदाहरणादाखल घेता येतील असे सांगून ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणात अडकलेले नेते भाजपमध्ये सामील होत आहेत आणि त्यांच्यावरील खटले बंद होत आहेत. पाकिस्तानातही विरोधकांचा सूड उगवण्यासाठी अशाच मार्गांचा अवलंब केला जातो.
दुसऱ्या एका निवेदनात उदित राज यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी मेवातमधील हिंसाचार घडल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, भाजपला फक्त मणिपूरमधून लोकांचे लक्ष वळवायचे आहे.
या हिंसाचाराला मोनू मानेसर जबाबदार असून त्यांनीच व्हिडिओ जारी करून हिंसाचार भडकावला. ज्या पद्धतीने टेकड्यांवरून गोळ्या झाडण्यात आल्या आणि छतावर दगडफेक करण्यात आली त्यावरून हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, हे लक्षात येते.