मंचर -पावसाळा जवळ येत असून साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी आरोग्य विभागाने आगाऊ नियोजन करावे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंचर उपजिल्हा रुग्णालयात असणारे 100 बेड आणि 20 आयसीयू कक्ष अद्ययावत करावेत.
आंबेगाव व जुन्नर परिसरात मुंबईहून आलेल्या व्यक्तींमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या भागातून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण करुन आरोग्य तपासणी करावी व काळजी घ्यावी, अशा सूचना कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
मंचर -अवसरी फाटा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आरोग्याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीला सहाय्यक जिल्हाअधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंदाराणी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश ढेकळे, मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, रुग्णसंख्या वाढली तर आपल्या भागात सरकारी व खाजगी आरोग्य यंत्रणा सतर्क करण्याबाबत, रुग्ण व संशयितांसाठी तयार केलेल्या विलगिकरण कक्ष व इतर ठिकाणी सुविधा व वैद्यकीय कर्मचारी उपलब्धता याबाबत चर्चा करण्यात आली. रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी तालुक्यात 3 रुग्णवाहिका खाजगी संस्थांकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
भीमाशंकर कारखान्याकडून मदत
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सॅनिटयाझर 100 मिली बॉटल 2 हजार नग, 5 लिटर कॅन 300 नग, 20 लिटर कॅन 50 नग, मास्क 10 हजार नग, सोडियम हायपोक्लोराईड 40 लिटरचे 20 नग, पीपीई किट 300 नग पंचायत समिती आंबेगाव यांना देण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक तथा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.