बलिया – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे. रशिया-युक्रेन युद्ध मोदी संपवतील अशी आशा संपूर्ण जगाला वाटत आहे, असे भाजपच्या खासदार असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी म्हटले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी येथे झालेल्या सभेत बोलताना हेमा मालिनी यांनी मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. भारताच्या प्रगतीसाठी मोदींनी स्वत:ला समर्पित केले आहे. याआधीच्या पंतप्रधानांपेक्षाही ते अधिक कार्य करत आहेत. त्यांच्यामुळे भारत विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवण्यासाठी योगी कार्यरत आहेत. त्यांची पाच वर्षांची कारकीर्द प्रगती, सुरक्षा आणि सुशासनाचे प्रतीक आहे. भावी पिढ्यांच्या भरभराटीसाठी मतदारांनी भाजपच्या पाठीशी उभे राहावे.
सप, बसप आणि कॉंग्रेसच्या प्रचारामुळे मतदारांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये. उत्तर प्रदेशात भाजपचा विजय निश्चित आहे. विधानसभेच्या 403 पैकी 300 हून अधिक जागा पक्ष जिंकेल, असा दावा हेमा मालिनी यांनी केला.