लखनौ – उत्तरप्रदेश विधानसभाच्या निकालात आमच्या जागा अडीच पटीने वाढल्या असून मतांच्या टक्केवारीतही दीड पटीने वाढ झाली आहे. त्याबद्दल आम्ही जनतेचे आभार मानतो. भारतीय जनता पक्षाच्या जागा आम्ही घटवू शकतो हे निकालाने दाखवून दिले आहे असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रीया देताना त्यांनी हे विधान केले आहे.
सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीतील सर्व विजयी आमदारांचे अभिनंदन करताना यादव यांनी त्यांना त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले आहे. भाजपच्या जागा कमी होऊ शकतात हे आम्ही या निवडणुकीत दाखवून दिले आहे. भाजपची घट यापुढील काळातही कायम राहील. त्यांच्या जागा अर्ध्यावर आल्या आहेत उर्वरित काही दिवसांत साफ होतील. आमचा यापुढेही जनहितासाठी संघर्ष सुरूच राहील, असेही अखिलेश यादव यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
उत्तरप्रदेशातील निवडणूक निकालानुसार, भाजपने 255 जागा जिंकल्या आहेत, तर अपना दल (सोनेलाल) आणि निशाद पक्षाने अनुक्रमे 12 आणि 6 जागा जिंकल्या आहेत. हे पक्ष भाजपचे मित्र पक्ष आहेत. सपाने 111 जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दल (RLD) ने आठ जागा जिंकल्या आहेत. सपाचा आणखी एक मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने सहा जागा जिंकल्या आहेत.
.