नवा चेहरा आणि नव्या पक्षाला दिली पसंती
पंजाबमध्ये कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन पक्षांनीच आलटून पालटून कारभार केला आहे. भाजप तेथे अकाली दलासोबत सत्तेत असायचा. मात्र अकाली दलाची सावलीत हा पक्ष त्या राज्यात मोठा होऊ शकला नाही. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अगोदर राजधानी दिल्लीत आणि आता त्याच स्टाईलने पंजाबमध्ये मुसंडी मारली आहे. विरोधी पक्ष त्यांनी औषधालाही ठेवलेला नाही, एवढे मोठे यश या राज्यात आपला मिळाले आहे. आपच्या या भव्य विजयाचे विश्लेषण पुढचे काही दिवस सुरू राहील, मात्र काही मुद्दे त्या पक्षाच्या विजयाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले आहे. एक मात्र नक्की की कधी काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा पंजाब आता मात्र आम आदमी पक्षाच्या हातात गेला आहे.
लोकांना हवा होता बदल
राज्यातील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अकालींशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला, कारण ते बादलांच्या विरोधातल्या आरोपांबाबत आक्रमक झाले नव्हते. त्यामुळे कॉंग्रेस आणि अकाली दल एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा समज निर्माण झाला होता. यावेळी पंजाब, विशेषतः माळव्यातील लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केले. आम्ही या वेळी फसणार नाही, भगवंत मान आणि केजरीवाल यांना संधी देऊ ही आपची घोषणा राज्यभर गाजली.
दिल्लीच्या प्रयोगाला पसंती
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल मतदारांच्या पसंतीस पडले. दर्जेदार सरकारी शिक्षण, आरोग्य, वीज आणि स्वस्त दरात पाणी. एक राज्य ज्याला विजेसाठी कमालीचे उच्च दर मिळत होते आणि जिथे आरोग्य आणि शिक्षणाचे बहुतेक खाजगीकरण केले जाते, त्या राज्यातले लोक या मॉडेलकडे आकर्षित झाले.
तरूणांच्या भवितव्याचा विचार
तरुण आणि महिला मतदारांचा पाठिंबा आपला मिळाला. केजरीवाल यांनी भ्रष्टाचार संपवण्याची दिलेली ग्वीा राज्यातल्या संवेदनशील आणि सरकारी प्रणाली बदलण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला अधिक भावली. नवीन सरकार आपल्याला शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, अशी आशा या तरुणांच्या मनात पल्लवीत झाली. तसेच अगोदरच्या बड्या नेत्यांकडून आपली पुढची पीढी अंधाराच्या दरीतच लोटली जाईल ही चिंता पालकांनाही सतावत होती. त्यामुळे त्यांनी प्रस्थापित पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना नाकारले. पंजाबकडे केवळ पैसे देणारी कंपनी म्हणून पाहणारे नेते आपले मोठे बिझनेस साम्राज्य निर्माण करून गब्बर झाले. त्यांच्या काळात आपल्या मुलांना काहीच संधी नसल्यामुळे मुलांना ब्रिटन आणि कॅनडा येथे पाठवण्याचा ट्रेंड पंजाबात बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्यालाही ब्रेक लावण्याचा प्रयत्न मतदार आता करत असावेत असे आपच्या विजयातून प्रतीत होते.
भगवंत मान यांची लोकप्रियता ठरली उपयोगी
भगवंत मान यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याने पक्षाला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी दिलेला बाहेरचा पक्ष हा टॅग काढून टाकण्यास मदत झाली. आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यंगाने अनेक पंजाबी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय विनोदी अभिनेता मान, स्वच्छ, मातीचा पुत्र अशी प्रतिमा असलेल्या कोणत्याही पारंपारिक राजकारण्यापेक्षा वेगळा आहे. आणि ते भाड्याच्या घरात कसे राहतात आणि लागोपाठच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची निव्वळ संपत्ती कशी कमी होत आहे हे सांगितल्याने त्याचाही फायदा पक्षाला झाला.