चंदौली, (उत्तर प्रदेश) -उत्तर प्रदेशात पूर्वी लोकांना घाबरवण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी अवैध हत्यारे तयार केली जात होती. मात्र आता देशाचे रक्षण करण्यासाठी तोफगोळे आणि क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जात आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात संरक्षण साहित्य उत्पादन कॉरिडॉर उभारला जात आहे, या संदर्भाने ते बोलत होते. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या विविध योजनांच्या यशस्वितेची माहितीही शहा यांनी यावेळी दिली.
चंदौली येथे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. अवैध हत्यारांच्या निर्मिती ऐवजी क्षेपणास्त्रांचे उत्पादन उत्तर प्रदेशात होणे हा बदल भाजपच्या सरकारमुळे झाला आहे, असे शहा म्हणाले. उत्तर प्रदेशातील 150 मतदारसंघांचा दौरा आपण केला आणि प्रत्येक ठिकाणच्या मतदारांचा कल लक्षात घेतला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमध्ये सपा आणि बसपाचा पूर्ण पराभव होईल.
आता लोक भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी कार्यरत आहेत. आता भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळाव्यात म्हणून काम करावे लागेल, असे आवाहनही शहा यांनी केले. उत्तर प्रदेशात एक किंवा दोन बाहुबली शिल्लक राहिले आहेत. 10 मार्चनंतर त्यांनाही तुरुंगात पाठवले जाईल. जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारत नाही. तोपर्यंत विकास होऊ शकणार नाही आणि औद्योगिक गुंतवणूकही होऊ शकणार नाही, असेही शहा म्हणाले.