अयोध्या – अयोध्येत होणारे राम मंदिर हा भाजपसाठी संपूर्ण देशभर राजकीय भांडवलाचा विषय ठरला असला तरी खुद्द अयोध्येत मात्र या मंदिराच्या निर्माण कार्याच्यावेळी ठिकठिकाणी जी पाडापाडी केली जात आहे त्यावरून स्थानिक नागरिक, अन्य मंदिरांचे पुजारी आणि व्यापाऱ्यांमध्ये भाजपच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा मोठा फटका यावेळी भाजपला बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येथील एक गमतीचा भाग असा की अयोध्येत तब्बल पंधरा हजार छोटी मोठी मंदिरे आहेत. या मंदिराचे पुजारी आपलेच मंदिर मूळ राम मंदिर असल्याचे भासवून आजपर्यंत तेथे मोठी गर्दी जमवत असत. त्यामुळे तेथील पुजारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा धंदाही चांगला चालत असे, पण आता अयोध्येत मोठ्या स्वरूपात मुख्य राम मंदिर उभे राहणार असल्याने या छोट्या मंदिरांकडे कोणी फिरकणार नाही त्यामुळे आपला बाजार आता उठणार या धास्तीने त्या मंदिरांचे पुजारी आणि व्यापारी नाराज आहेत.
तसेच मुख्य मंदिराकडे जाणारा रस्ता चार पदरी केला जात असल्याने त्याच्या आसपासच्या दुकानांची व घरांचीही मोठ्या प्रमाणात पाडापाडी केली जाणार आहे. त्यामुळे तेथील नागरीक आणि दुकानदारही नाराज आहेत. त्यांचे म्हणणे असे की, या पाडापाडीच्या बदल्यात सरकारने दिलेली नुकसानभरपाई अत्यल्प आहे. त्यातून दुसरीकडे दुकान विकत घेणे दुरापास्त आहे. गेल्या निवडणुकीत अयोध्येच्या परिसरातील पाचही विधानसभेच्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण यावेळी खुद्द अयोध्येतच स्थानिकांची नाराजी कशी दूर करायची हा भाजपच्या पुढील प्रश्न आहे.
पुजारी नाराज, स्थानिक व्यापारी, दुकानदार नाराज, ब्राह्मण परेशान, मुस्लीम यादवांची साथ नाही, अशा स्थितीत भाजपला हा गढ वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक भाजप आमदार येथील गेल्या पाच वर्षांत लोकांची चौकशीही करायला आले नाहीत अशी स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करायला भाजपच्या मोठ्या नेत्यांना येथे वारंवार यावे लागत आहे. अशा स्थितीत येथील निकाल विपरीत लागू शकतो, ही धास्ती भाजप नेत्यांना सतावू लागली आहे.