पुणे -जिल्ह्यात 13 तालुक्यांतील भूजलपातळीत सरासरी 1 फुटाने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चांगला पाऊस पडणाऱ्या तालुक्यांपेक्षा दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणारे दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरुर, मावळ या तालुक्यांमध्ये पाणी पातळीत चांगली वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या निरीक्षणात नोंदविण्यात आली आहे. परतीचा आणि अवकाळी पाऊस चांगला झाल्याने या पाच तालुक्यांमध्ये भूजलपातळीत सव्वा फूट ते अडीच फुटांपर्यंत वाढ झाली आहे.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत दर तीन महिन्यांनी भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात.
या नोंदीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूजल पातळीत झालेली वाढ, तसेच घट समजते. भूजल विभागाने नुकत्याच घेतलेल्या नोंदीत जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत सरासरी 3.25 मीटरने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भूजल पातळीत सर्वाधिक वाढ बारामती तालुक्यात असून याठिकाणी 2.62 फूट भूजल पातळीत वाढ नोंदविण्यात आले आहे.
दौंडमध्ये 1.70 फूट, इंदापूरमध्ये 1.31 फूट, पुरंदरमध्ये 2.55 फूट आणि शिरूरमध्ये 1.80 फूट वाढ झाली आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्याने तेथील भूजलपातळीत अल्प वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. मावळ, मुळशी, वेल्हा आणि भोर तालुक्यांमध्ये अर्ध्या फुटांपर्यंत वाढ झाली आहे.
192 विहिरींचा अभ्यास
भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता जिल्ह्यात 192 विहिरी निश्चित केल्या आहेत. यात 71 कूपनलिकांचा समावेश आहे. भूजल पातळी दर तीन महिन्यांनी नोंदवली जाते. पाणलोट क्षेत्रांनुसार भूजल नोंदणीची ठिकाणे ठरवली जातात. या कूपनलिकांमधील पाण्याचा उपसा केला जात नाही.