स्वप्निल श्रोत्री
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा काय आहे हे माहीत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण आहे. तेव्हा ह्युंदाईसारखी जगातील नावाजलेली कंपनी, जिची भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही राष्ट्रांत शाखा आहे त्यांनी पाकिस्तानला किंवा पाकिस्तानी नागरिकांना खूश करण्यासाठी काश्मीरमधील दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार हास्यास्पद अधिक आहे.
कार उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ह्युंदाईचे नाव सर्वसामान्यांना निश्चितच परिचयाचे असेल. कमी किमतीत चांगल्या दर्जाची कार बनवण्यात कंपनीचा हातखंडा असल्यामुळे अल्पावधीत ह्युंदाई कार कंपनी जगभरातील ग्राहकांच्या पसंतीस पडली. जगातील अनेक देशांमध्ये ह्युंदाईच्या शाखा असून अब्जावधीचा व्यवसाय आहे. आज ह्युंदाई आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचे कारण म्हणजे ह्युंदाईची पाकिस्तानातील शाखा असणाऱ्या ह्युंदाई पाकिस्तानने 5 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील मृत दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन जगाला करून दिले.
पाकिस्तान सरकार 5 फेब्रुवारी हा दिवस जम्मू आणि काश्मीरचा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करते. त्यात काश्मीर युद्धात मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली जाते; तर जे लोक आज काश्मीरसाठी लढत आहेत (थोडक्यात दहशतवादी) त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अशा वेळी पाकिस्तानच्या या कथित कार्यक्रमात सहभागी होऊन भारतीय नागरिक व माध्यमांचा रोष ओढवून घेण्याचा मूर्खपणा ह्युंदाईने केला आहे.
मूर्खपणा हास्यास्पद
व्यावसायिक क्षेत्रात काम करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. विशेषतः जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनी असाल तर नियम हे अधिकच काटेकोरपणे पाळले जातात. कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना यांच्या विचारधारेबरोबर काम करणे व्यावसायिक दृष्टीने घातक असते. कारण आपण ज्या पक्षाच्या विचारधारेबरोबर आहोत त्यांच्या विरोधी पक्षांचे सरकार जर आले तर कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बहुराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय कंपन्या या वादविवाद होतील किंवा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांपासून कायम दूर राहणे पसंत करतात.
2019 मध्ये भारतात ह्युंदाईच्या 5 लाख 8 हजार कारची विक्री झाली, तर याच वर्षी पाकिस्तानात ह्युंदाईने 80 हजार कारची विक्री केली. अशा वेळी व्यावसायिक दृष्टीने आपणास पाकिस्तान महत्त्वाचं आहे की भारत महत्त्वाचा आहे याचा साधा विचारसुद्धा कंपनीने केला नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये एकाच वेळी व्यवसाय करणारी ह्युंदाई ही पहिली कंपनी नाही. ह्युंदाईशिवाय नेस्ले, युनिलिव्हर, गुगल, स्टॅंडर्ड चार्टर, मास्टरकार्ड, कोको कोला, सॅमसंग, मॅकडोनल्ड अशी अनेक नावे घेता येतील. परंतु दोन्ही राष्ट्रांमध्ये संवेदनशील असलेल्या विषयांना हात घालून वाद ओढवून घेण्याचा प्रकार इतर कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग
पाकिस्तानने कितीही आदळआपट केली तरी जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आज जागतिक राजकारणात पाकिस्तानची जी प्रतिमा आहे त्याला पाठबळ देण्याचे धाडस कोणते राष्ट्र दाखवत नाही. अपवाद फक्त चीन आणि तुर्कीचा आहे. ही दोन्ही राष्ट्रे आपल्या वैयक्तिक कारणांसाठी पाकिस्तान बरोबर आहेत. पूर्वी काश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेला जागतिक समर्थन होते. विशेषतः मुस्लीम राष्ट्रांकडून पाकिस्तानला अनेकदा सक्रिय मदत झाली आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या बाजूने वादात उडी घेत भारताला युद्धाची धमकी दिल्याचा इतिहास आहे. परंतु, हळूहळू पाकिस्तानचे खरे रूप जगासमोर येऊ लागल्यावर अमेरिका व इतर मुस्लीम राष्ट्रांनी पाकिस्तानपासून चार हात लांब राहणेच पसंत केले.
भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 व कलम 35 अ हटवून आज दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी पाकिस्तानच्या बाजूने कोणत्याही राष्ट्राने भूमिका घेतली नाही. किंबहुना संयुक्त राष्ट्रे व मुस्लीम राष्ट्रांचे सर्वात मोठी संघटना असलेल्या ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) नेसुद्धा पाकिस्तानकडे कानाडोळा केला. अमेरिका जी एकेकाळी पाकिस्तानसाठी “रेड कार्पेट’ घालीत होती; त्या अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन एक वर्ष उलटले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली नाही. किंबहूना फोनवरून त्यांच्याशी साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे पाकिस्तानने काश्मिरातील दहशतवाद्यांसाठी किती वेळा श्रद्धांजली वाहिली व त्यांचे कितीही मोठे स्मारक पाकिस्तानात बांधले तरी त्याचा भारतावर किंवा जागतिक राजकारणावर कसलाही परिणाम होणार नाही.
काश्मीर आज हळूहळू विकासाच्या प्रवाहात येऊ पाहात आहे. भारत सरकार व भारतीय लष्कर यासाठी प्रयत्नशील आहे. काश्मिरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना असो, “देखो अपना देश’ अंतर्गत काश्मिरी विद्यार्थ्यांना भारत भ्रमणाची संधी देणे असो, काश्मिरात रोजगार निर्माण व्हावा; उद्योगधंदे तयार व्हावेत यासाठी उद्योगपतींना सरकारने केलेले आवाहन असो किंवा सबसिडी योजना असो असे अनेक उपक्रम भारत सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवित आहे. केवळ भावना आणि धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशाचा विकास होत नसतो एवढे जरी पाकिस्तानला समजले तरी पुष्कळ आहे.