भारत व बांगला देश यांच्या सागरी सरहद्दी ठरल्या
डाक्का, दि. 10 – भारत व बांगला देश यांनी एक करार केला असून त्या अन्वये बंगालच्या उपसागरातील सागरी सरहद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या दरम्यान परस्पर समजुतींनी या सागरी सरहद्दीचा प्रश्न सुटला आहे. या करारामुळे या दोन्ही शेजारी राष्ट्रांचे हितसंबंध सुरक्षित राखले जाणार आहेत.
बौद्ध विद्यापीठ काढण्याचा विचार होणार
नगर – जपान बौद्ध संघाचे अध्यक्ष, आशिया खंडातील बौद्धांचे प्रमुख 91 वर्षांचे पूज्य महन्त फुजी गुरूजींचे म. हिंगाई, म. शांती शुगई (भारतीय बौद्ध संघाचे प्रमुख), म. शीबाशा या शिष्यवर्गासह नगरला आगमन झाले. यावेळी गुरूजींनी मुंबई येथे बौद्ध विद्यापीठ काढण्याचा मनोदय प्रगट केला. बुद्धाची शिकवण आचारणात आणण्यास लोकांना सांगितले. हा विचार अमलात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
15 जपानी महिला एव्हरेस्टकडे निघाल्या
काठमांडू – पंधरा जपानी महिला गिर्यारोहकांची एक तुकडी काल जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी येथून निघाली. तुकडीच्या प्रमुख एश्का हिसॅनो (वय 41) यांनी सांगितले की, “आम्ही एव्हरेस्ट सर करणे अशक्य नाही!’ अजून एव्हरेस्टवर एकही महिला गेलेली नाही. त्यामुळे या टीमला जगभरातून शुभेच्छा दिल्या गेल्या.
आता वृत्तपत्रे खा!
नवी दिल्ली – वृत्तपत्रे नेहमी जगातील अन्नटंचाईबद्दल बातम्या देत असतात, परंतु लवकरच अन्नटंचाई प्रत्यक्ष दूर करण्यासाठी त्यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे! “ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’ या नियतकालिकात असे प्रसिद्ध झाले आहे की, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. कीथ स्टाइनक्रॉस यांनी असा शोध लावला आहे की, वृत्तपत्रांचा व इतर प्रकारांच्या कागदात “मायक्रोबायल’ प्रोटीन्स असतात. कागदावर प्रक्रिया करून अन्नात त्याचे रूपांतर करता येईल व ते अन्न दूध व मांस यांची उणीव भरून काढण्यासाठी वापरता येईल!