सातारा -सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीसाठी गुरुवारी पालिकेची ऑनलाइन सभा झाली. या निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी स्वतः पालिकेत येऊन शेंडे यांचा सत्कार केला.
सातारा पालिकेच्या 2016 सालच्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. सौ. माधवी कदम या थेट नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आल्या. साविआचे नेते खा. उदयनराजे यांनी उपनगराध्यक्षपदी प्रारंभी राजू भोसले यांना आणि त्यानंतर अनुक्रमे सुहास राजेशिर्के, किशोर शिंदे यांना संधी दिली होती. खा. उदयनराजे यांच्या सूचनेनुसार किशोर शिंदे यांनी सौ. माधवी कदम यांच्याकडे उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी करंजे भागातील मनोज शेंडे यांचेच नाव चर्चेत होते. खा. उदयनराजेंचे निवासस्थान असलेल्या जल मंदिर येथे गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र गतिमान झाले होते. कामाचा अनुभव, राजकीय समन्वय,हे गुण असलेल्या शेंडे यांच्या नावाला आघाडीच्या नगरसेवकांनी एकमताने पसंती दिली होती.
सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या करंजेच्या ग्रामीण भागातील राजकीय पेरणीसाठी उदयनराजे यांनी शेंडे यांची निवड केली. या पदाच्या निवडणुकीत आज सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आला. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी 12.15 वाजता उमेदवारी अर्जाची छाननी करून तो वैध ठरवला. या पदासाठी शेंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष माधवी कदम यांनी शेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा 12.45 वाजता केली. या निवडीनंतर सौ. कदम, किशोर शिंदे यांनी शेंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शेंडे यांनी यापूर्वी बांधकाम समितीच्या सभापतिपदी काम केले होते.
पालिका प्रशासनाशी राखलेला उत्तम समन्वय आणि करंजे गावठाणात लोकसंपर्क, कामाचा झपाटा, या शेंडे यांच्या जमेच्या बाजू असल्याने उदयनराजे यांनी त्यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिल्याचे सांगितले जाते. सातारा शहराची हद्दवाढ झाली असून पालिका निवडणुकीला जेमतेम एक वर्ष बाकी आहे. हद्दवाढीनंतर सात नवीन नगरसेवकांची भर पालिकेत पडणार आहे. त्यामुळे हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागावर मनोज शेंडे यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या भागात सातारा विकास आघाडीची ताकद वाढवावी लागणार आहे.
विकासकामांसाठी आग्रही राहणार
साताऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी खा. उदयनराजेंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. घनकचरा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करायचा असून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी केबिनमध्ये आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणार आहे. यापूर्वी बांधकाम समितीच्या सभापतिपदी काम केल्याने पालिकेच्या प्रशासनाची माहिती आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.