पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आता विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन देशातच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अद्यापही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, त्यामुळे खासगी व सरकारी विद्यापीठांनी या शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यापाल रमेश बैस यांनी केले.
एज्युकेशन प्रमोशन सोसायटी फाॅर इंडियातर्फे (ईपीएसआय) आयोजित विकसित भारतासाठी उच्च शिक्षणाची भूमिका या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी ईपीएसआयचे अध्यक्ष डाॅ. एम. आर. जयराम, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे संस्थापक डाॅ. जी. विश्वनाथन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. मंगेश कराड, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड काॅमर्सचे डाॅ. एच. चतुर्वेदी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन उपाध्यक्ष डाॅ. अभय जेरे, मानव रचना शिक्षण संस्थेचे डाॅ. प्रशांत भल्ला आदी उपस्थित होते.
राज्यपाल बैस म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी खासकरून मुली आजही उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे. पूर्वी लोक केवळ नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घ्यायचे, आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
एआयसारख्या तंत्रज्ञानामुळे पालकांचा कौशल्याधिष्ठित शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे विकसित भारताच्या वाटचालीत सरकारीसह खासगी विद्यापीठांचा वाटाही मोठा असणार आहे. यासह कारागृहातील कैद्यांना देखील शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
डाॅ. कराड प्रास्ताविकात म्हणाले, भारताला विकसित करण्यासाठी शिक्षण क्षेत्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. युवकांचा देश अशी भारताची ओळख आहे. त्यामुळे ही युवा शक्तीच खऱ्या अर्थाने देशाला विकसित करण्यात मोठा हातभार लावणार आहे.
सध्या या युवकांना घडविण्याचे काम भारतातील सरकारी व खासगी विद्यापीठे करत आहेत. त्यामुळे विकसित भारताकडे वाटचाल करत असताना ही विद्यापीठेही विकसित होणे व त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणेही तितकेच आवश्यक आहे.