नवी दिल्ली -दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी बनण्यास सज्ज होणार आहे. अर्थात, देशव्यापी मोर्चाचे स्वरूप बिगरराजकीयच ठेवले जाणार आहे.
शेतकरी आंदोलन स्थगित केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाच्या पुढील वाटचालीचे सूतोवाच शेतकरी नेते दर्शन पाल यांनी केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाहीत याविषयीचा आढावा घेण्यासाठी मोर्चाची बैठक पुढील महिन्यात (15 जानेवारी) होणार आहे. त्या बैठकीत मोर्चाला देशव्यापी स्वरूप देण्याच्या दृष्टीने चर्चा होईल.
अर्थात, मोर्चाचे स्वरूप बिगरराजकीय संघटनेचेच असेल. त्यामुळे राजकारणात सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी नेत्यांनी मोर्चातून बाहेर पडावे, असे ते म्हणाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक दबाव गट म्हणून कार्यरत राहण्याचा मोर्चाचा मानस असल्याचे सूचित होत आहे.
वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मोर्चाने 40 संघटनांचे प्रतिनिधित्व केले. आता आणखी व्यापक बनण्यास मोर्चा सरसावणार आहे.