मुंबई – शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या विधानांचा समाचार घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात उतरले होते.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमीत्त न बोलावता तिकडे केक खायला गेले होते असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पण त्यामुळे काय बिघडले असा सवाल राणे यांनी केला. आंतरराष्ट्रीय संबंध, राजनैतिक संबंध हा एक विषय असतो, त्यामुळे कधीकधी दोन देशांमधील पंतप्रधानांना असा निर्णय घ्यावा लागतो. पण तो विषय उद्धव ठाकरे यांना कळणार नाही असे राणे म्हणाले.
या पत्रकार परिषदेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदातील काही कळले नाही. त्यांना हा दोन राष्ट्रांमधील संबंधांचा विषय कळणार नाही. आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ते केवळ अडीच तास मंत्रालयात गेले असा दावाही त्यांनी केला.
मोठ्या माणसांवर टीका केली म्हणजे आपण मोठे होतो असे जर ठाकरे यांचा समज असेल तर तो चुकीचा आहे. अशा विधानांनी उद्धव ठाकरे मोठे होणार नाहीत असेही राणे यांनी नमूद केले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिमग्या सारखा झाला. त्यात कोणतीही बौद्धिक पातळी नव्हती अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले, पण या काळात त्यांनी मराठी माणसांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी एक तरी काम केले आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिव्या शाप आणि पोकळ वल्गना या खेरीज या मेळाव्यात दुसरं काही नव्हतं. यावेळी मला शिव्या घालण्यासाठी मुद्दाम काही माणसं बोलावण्यात आली होती असा आरोपही त्यांनी केला.